आषाढी वारीत यावर्षीही ‘विशेष दर्शन सुविधा’ बंद ! – जयकुमार गोरे, पालकमंत्री

डावीकडून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन, पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

पंढरपूर – आषाढी वारीच्या काळात वारकरी आणि भाविक यांना अल्प वेळेत, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, यांसाठी १० जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विशेष दर्शन सुविधा (व्हीआयपी दर्शन) बंद ठेवण्याचा, तसेच मंदिर परिसर ‘वाहन प्रवेशबंदी क्षेत्र’ (नो व्हेईकल झोन) करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. के.बी.पी. महाविद्यालयात झालेल्या आषाढी वारी पूर्वसिद्धता बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की,

१. मागील वर्षी विशेष दर्शन सुविधा बंद आणि ‘वाहन प्रवेशबंदी क्षेत्रा’ची कार्यवाही केल्यामुळे भाविकांचा दर्शनासाठी लागणारा वेळ पाच ते सहा घंट्यांनी अल्प झाला होता.

२. गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी झाले आणि पोलिसांनाही सुरक्षा व्यवस्था राखणे सोपे झाले.

३. वारीपूर्वी पालखी मार्ग, पालखी तळ आणि मुक्कामस्थळी स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालये, महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष, वीज, आरोग्य सुविधा आणि दिशादर्शक फलक लावावेत.

४. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्ती, तात्पुरत्या शौचालयांची उभारणी अन् स्वच्छतेवर विशेष भर आणि चंद्रभागा नदीपात्रातील मोठे खड्डे बुजवणे, आषाढीपूर्वी नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करावे.

५. नदीकाठावरील सुरक्षा वाढवणे तसेच पालखी मार्गालगत असलेल्या विहिरींना भक्कम संरक्षक कठडे उभारणी, राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे, वाखरी ते केबीपी महाविद्यालय रस्ता, प्रकाशयोजना, स्वच्छता अन् वृक्षारोपणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

६. मुख्यमंत्री आरोग्य रथ, वारकरी सेवा सुविधा केंद्रे, आरोग्य पथके आणि औषधसाठा सज्ज ठेवण्यावरही भर देण्यात आला.

७. वीज वितरण आस्थापनाने २४ घंटे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, तर ‘मोबाईल नेटवर्क’च्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.