विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !

मुंबई, २ जुलै (वार्ता.) – विरोधी पक्ष नेते म्हटले की, सत्ताधार्‍यांना कोणत्या विषयावर घेरायचे, कोणते सूत्र लावून धरायचे असे चित्र डोळ्यांपुढे उभे रहाते. सध्या चालू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मात्र कामकाजाविषयी विरोधी पक्षांची बैठकच होत नाही. अशी महाविकास आघाडीची दु:स्थिती आहे. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी बैठक होत नसल्याची स्वीकृती देऊन महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर शिक्कामोर्तब केला आहे.

१ जुलै या दिवशी विधीमंडळाच्या पत्रकार कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना नाना पटोले यांना पत्रकारांनी ‘विधानसभेत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते बोलत नाहीत. कोणते सूत्र एकजुटीने मांडत नाहीत. दुसर्‍या दिवशी सभागृहात कोणती सूत्र मांडावीत, याविषयी महाविकास आघाडीत पक्षांची एकत्रित बैठक होत नाही का ?’ असे प्रश्न विचारले. यावर नाना पटोले ‘महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची कामकाजाविषयी नियमित एकत्रित बैठक व्हायला हवी; मात्र तसे होत नाही’, असे म्हणाले. एकतर पुरेशी सदस्यसंख्या नसल्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत ‘विरोधी पक्षनेते’ निवडलेले नाहीत. त्यात पक्षांमध्येही समन्वय नाही. त्यामुळे सध्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष कमकुवत असल्याचे पहायला मिळत आहे.