सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘वायुतत्त्वाचे सामर्थ्य’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण – वायुतत्त्वाचे सामर्थ्य लक्षात येणे

‘आज व्हरांड्यातून बाहेरच्या दृश्याकडे पाहिले, तर वार्‍यामुळे १ – २ घंटे पुष्कळ हलणारी अनेक झाडे दिसली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘एका झाडाची एक छोटीशी फांदी हलवायला आपल्याला कितीतरी शक्तीचा व्यय करावा लागतो. साधारणपणे ५ ते १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ फांदी सतत हलत ठेवता येत नाही; कारण आपण दमतो. एक झाड संपूर्णपणे हलवायची क्षमता आपल्यात नसते. वार्‍यामुळे कित्येक चौरस कि.मी. जागेतील सहस्रो झाडे सहजतेने हलतात.’ यावरून ‘वार्‍यात केवढे सामर्थ्य आहे आणि मानव निसर्गापुढे किती दुर्बल आहे !’, हे माझ्या लक्षात आले. भूकंपामुळे पृथ्वीतत्त्वाचे, मुसळधार पावसामुळे येणार्‍या पुरामुळे आपतत्त्वाचे आणि ज्वालामुखीमुळे तेजतत्त्वाचे सामर्थ्य ते प्रसंग दृश्यस्वरूपात असल्यामुळे कळते. वायुतत्त्वाचे सामर्थ्य मात्र वायू अदृश्य असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही. ते आजच्या दृश्यामुळे माझ्या लक्षात आले.’ (निज वैशाख शुद्ध १०, कलियुग वर्ष ५११२ (२३.५.२०१०))

श्री. राम होनप

२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. पंचतत्त्वांचे वर्गीकरण

२ अ १. अपरोक्ष तत्त्वे : ‘डोळ्यांना दिसणारे किंवा प्रत्यक्ष अनुभवास येणारे’, याला ‘अपरोक्ष’, असे म्हणतात. पंचतत्त्वांपैकी पृथ्वी, आप आणि तेज ही तत्त्वे ‘अपरोक्ष तत्त्वे’ आहेत. भूमी, वस्तू आणि निसर्ग हे घटक पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आहेत. पाणी आपतत्त्वाशी आणि अग्नी तेजतत्त्वाशी संबंधित आहे.

२ अ २. परोक्ष तत्त्व : डोळ्यांच्या पलीकडे अनुभवाला येणार्‍याला ‘परोक्ष तत्त्व’, असे म्हणतात. पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाला ‘परोक्ष तत्त्व’, असे म्हणतात.

२ अ ३. अस्तित्व : पंचतत्त्वातील आकाशतत्त्वाला ‘अस्तित्व’ स्वरूपात गणले आहे.

२ आ. पंचतत्त्वे आणि त्यांची सूक्ष्मता : पृथ्वीतत्त्व ‘सूक्ष्म’ आहे. आपतत्त्व ‘सूक्ष्मतर’ आहे. तेजतत्त्व ‘सूक्ष्मतम’ आहे. वायुतत्त्व ‘परम सूक्ष्म’ आणि आकाशतत्त्व ‘सर्वाेच्च’ मानले आहे.

२ इ. शरिराचे कार्य आणि पंचतत्त्वे यांचा संबंध : व्यक्तीच्या शरिरातील अन्न (पृथ्वीतत्त्व), पाणी (आपतत्त्व) आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा अग्नी (तेजतत्त्व) यांचे कार्य बिघडले की, व्यक्तीचे आरोग्य बिघडते अन् तिला विविध रोग होतात. शरिरातील वायूचे प्रमाण न्यून होऊ लागल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या प्राणावर होतो. त्यामुळे शरिरात वायूला सर्वाधिक महत्त्व आहे.

२ ई. पृथ्वीचे कार्य आणि पंचतत्त्वे यांचा संबंध : अन्नाचा तुटवडा (पृथ्वीतत्त्वाचा अभाव), पाण्याची न्यूनता (आपतत्त्वाचा अभाव) आणि ज्वालामुखीचा उद्रेक (तेजतत्त्वाचा प्रकोप)  झाल्यास त्या त्या ठिकाणची जीवसृष्टी धोक्यात येते. कालांतराने ती परिस्थिती पूर्ववत् होते; परंतु वायू दूषित होऊन त्यात रज-तम निर्माण झाल्यास पृथ्वीवरील सात्त्विकता न्यून होते आणि वाईट शक्तींचे प्राबल्य वाढते. परिणामी समाजात दुःख, अशांतता आणि संघर्ष यांत पुष्कळ वाढ होते अन् ही परिस्थिती दीर्घकाळ टिकते. त्यामुळे सात्त्विक आणि सज्जन लोकांना जीवन नकोसे होते. वायुतत्त्वात सूक्ष्मता असल्याने समाजावर त्याचा परिणाम अधिक होतो.

२ उ. पंचतत्त्वे आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

 ‘पंचतत्त्वांचे गुणधर्म आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये’ यांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वरील लिखाणाद्वारे ‘पृथ्वी, आप अन् तेज यांचे सामर्थ्य दृश्य स्वरूपात असल्याने ते लक्षात येते; परंतु वायुतत्त्वाचे सामर्थ्य अदृश्य असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही’, असे म्हटले आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.