Satyaki Savarkar : उलटतपासणीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी सडेतोड उत्तरे देऊन राहुल गांधी यांच्या अधिवक्त्यांचे मनसुबे उधळले !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण

उजवीकडे सात्यकी सावरकर

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी बिनबुडाचे आरोप आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात चालू असलेल्या अपकीर्तीच्या खटल्यात पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी चालू आहे. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि याचिकाकर्ते श्री. सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेण्यात आली . सावरकरांची देशभक्ती आणि ‘वीर’ उपाधी यांच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे राहुल गांधी यांच्या अधिवक्त्यांचे सर्व आक्षेप श्री. सात्यकी सावरकर यांनी सडेतोड उत्तरे देऊन खोडून काढले. न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे सावरकर यांची उलटतपासणी १ जुलै २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आली.

न्यायालयात श्री. सात्यकी सावरकर यांनी मांडलेली सत्य बाजू !

१. अंदमानातील शिक्षेपूर्वीच सावरकर ‘वीर’ होते !

सुनावणीच्या काळात राहुल गांधी यांच्या अधिवक्त्यांनी सावरकर यांना मिळालेल्या ‘वीर’ या उपाधीवर आक्षेप घेतला. त्यावर ऐतिहासिक संदर्भ देत श्री. सात्यकी सावरकर म्हणाले, ‘‘विख्यात ‘गदर चळवळी’च्या साहित्यातही सावरकर यांचा उल्लेख ‘वीर सावरकर’ असा आहे. ही उपाधी सरकारी पाठबळामुळे मिळालेली नसून जनतेने त्यांच्या क्रांतीकार्याची नोंद घेऊन दिलेला सर्वोच्च लोकसन्मान आहे.’’

२. ब्रिटिशांना सावरकर यांची भीती होती !

ब्रिटीश राजवटीत याचिका प्रविष्ट (दाखल) करणे ही नियमित आणि कायदेशीर प्रक्रिया होती. सावरकरांच्या सर्व याचिका ब्रिटीश सरकारने फेटाळल्या होत्या. ब्रिटिशांच्या अंतर्गत नोंदींनुसार, सावरकरांची सुटका झाल्यास ‘ते पुन्हा ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करतील’, अशी भीती ब्रिटीश अधिकार्‍यांना होती. (राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कायदेशीर समूहाने सावरकरांच्या ज्या ‘दया याचिकां’चा बाऊ करण्याचा प्रयत्न केला, तो केवळ राजकीय द्वेषापोटी केलेला अपप्रचार होता. तत्कालीन ब्रिटीश कायद्यानुसार ती एक न्यायालयीन प्रक्रिया होती; पण हे समजून न घेणे ही काँग्रेसवाल्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे ! – संपादक)

३. स्वतःच्या सुटकेसाठी नव्हे, तर सर्व बंदीवानांसाठी लढा !

सावरकरांनी याचिकांद्वारे केवळ स्वतःच्या सुटकेची मागणी केली नव्हती, तर अंदमानच्या नरकात सडणार्‍या इतर सर्व राजकीय बंदीवानांच्या सुटकेची मागणी लावून धरली होती. (स्वतःपेक्षा इतरांच्या अधिकारासाठी लढणे, हा इतिहास आजच्या स्वार्थी लोकांना कधीच समजणार नाही ! – संपादक)

४. विविध क्रांतीकारकांना वेगवेगळ्या उपाध्या देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव !

भगतसिंह, राजगुरु, सुखदेव आणि बटुकेश्वर दत्त या महान क्रांतीकारकांचे संदर्भ देत श्री. सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले की, देशातील समाजाने विविध क्रांतीकारकांच्या योगदानाचा गौरव वेगवेगळ्या उपाध्या देऊन केला आहे. जनतेनेच कुणाला ‘वीर’, कुणाला ‘महात्मा’, तर कुणाला ‘नेताजी’ म्हटले आहे. या खटल्याचे मुख्य सूत्र स्वातंत्र्यवर सावरकरांच्या दया याचिका हे नसून राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित अपकीर्तीकारक विधानांविषयीचे आहे. या अपकीर्तीच्या संदर्भातील सर्व भक्कम आणि आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.