केरळ राज्य परिवहन महामंडळाने महिलेला ३५ सहस्र रुपये भरपाई द्यावी ! – ग्राहक न्यायालयाचा आदेश

वेळेआधी बस सुटल्याने महिलेची डॉक्टरांना भेटण्याची वेळ चुकली  

AI निर्मित चित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – वेळेपूर्वीच बस सुटल्यामुळे महिलेची बस चुकली आणि यामुळे तिची रुग्णालयातील डॉक्टरांना भेटण्याची वेळ चुकली. यानंतर महिलेने ग्राहक वाद निवारण आयोगाकडे दाद मागितली. ग्राहक न्यायालयाने महिलेच्या बाजूने निर्णय देत ‘केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळा’ला (‘के.एस्.आर्.टी.सी.’ला) सदर महिला प्रवाशाला ३५ सहस्र रुपये हानीभरपाई देण्याच आदेश दिला. यात २५ सहस्र रुपये भरपाई आणि १० सहस्र रुपये खटल्याचा  खर्च यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार महिलेने २४ ऑगस्ट २०२४ या दिवशी कट्टाकडा येथून एर्नाकुलम् येथील एका रुग्णालयात जाण्यासाठी (‘के.एस्.आर्.टी.सी.’च्या) अतीजलद बसचे तिकीट आरक्षित केले होते. ही बस सकाळी ८ वाजता वाजता थिरुवल्ला येथून सुटणार होती. महिलेला दुपारी १२.३० वाजता एका डॉक्टरांना भेटण्याची वेळ (अपॉइंटमेंट) मिळाली होती. महिला सकाळी ७.३० वाजताच बस थांब्यावर पोचली आणि ८.१० वाजेपर्यंत बसतची वाट पहात थांबली. बस न आल्याने तिने बसमधील कर्मचार्‍यांशी संपर्क साधला. तेव्हा कर्मचार्‍यांनी बस थिरुवल्ला ओलांडून कोट्टायम येथे पोहोचल्याचे, तसेच तिला दुसर्‍या बसने येण्यास सांगण्यात आले.

‘वेळेपूर्वी बस सोडणे आणि त्यामुळे बसचे आरक्षण केलेल्या प्रवाशाची बस चुकणे, हा सेवेतील त्रुटीचा प्रकार आहे’, असे ग्राहक न्यायालयाने नमूद करत ‘के.एस्.आर्.टी.सी.’ला वरीलप्रमाणे दंड ठोठावला.