भेसळ आणि दराच्या वादात गुर्‍हाळ व्यवसाय संकटात !

दौंड (पुणे) – अन्न व औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.ने) केलेल्या धडक कारवाईमुळे दौंड तालुक्यातील अनुमाने ४०० गुर्‍हाळघरे बंद झाली आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव आणि बोरीपार्धी येथे झालेल्या धाडीत १७ लाख रुपयांचा भेसळयुक्त गूळ जप्त करण्यात आला, ज्यामुळे परप्रांतीय चालक धास्तावले आहेत.

या कारवाईनंतर आता उसाच्या दरावरून पेच निर्माण झाला आहे. शुद्ध आणि भेसळमुक्त गूळ निर्माण करण्यासाठी अन् आर्थिक गणित जुळण्यासाठी उसाचा दर प्रतिटन ३ सहस्र ५०० रुपये असावा, अशी मागणी गुर्‍हाळ चालकांनी केली आहे; तर मालक आणि शेतकरी ४ सहस्र २०० रुपयांच्या दरावर ठाम आहेत. या वादामुळे गाळप ठप्प असून अनुमाने ३ सहस्र टन ऊस आता वाळू लागला आहे. यावर सुवर्णमध्य काढण्यासाठी केडगाव येथे महत्त्वाची बैठक होणार आहे.

संपादकीय भूमिका

भेसळयुक्त गूळ सिद्ध करून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांवर वचक बसावा, यासाठी कठोर पावले उचलायला हवीत !