स्वारगेट बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याच्या अपुर्‍या सुविधेचा विक्रेत्यांकडून अपलाभ !

अन्य सुविधांचाही मोठ्या प्रमाणात अभाव आणि सुरक्षितता ऐरणीवर !

पाण्याची बंद ठेवलेली टाकी (डावीकडे) व कुलरची दुर्दशा (उजवीकडे)

पुणे, १२ जून (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील सर्वांत मुख्य आणि जुन्या असलेल्या स्वारगेट बसस्थानकावर सांडपाण्याची व्यवस्था नीट न केल्यामुळे पाण्याच्या मुख्य टाकीच्या भागात पाणी तुंबत आहे. त्यामुळे ही पाण्याची टाकी बंद ठेवण्यात आली आहे. परिसरात पाण्याचे ४ कूलर असून त्यांची पहाणी केली असता त्यातील केवळ १ चालू होता. या संदर्भात संबंधित आगाराच्या प्रमुखांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘रोटरी क्लबवाल्यांनी ते बसवले आहेत, ते आल्यावर त्यांना सांगतो.’’ (असे उत्तर देणारे नको, तर संबंधितांना तात्काळ कळवून कूलरची दुरुस्ती करणारे आणि प्रवाशांची काळजी घेणारे अधिकारी हवेत ! – संपादक)

१. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या अपुर्‍या सुविधेचा अपलाभ घेत बाहेरील, तसेच स्थानकातील पाणीकेंद्रातील विक्रेते प्रवाशांना १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना विकत आहेत. या विक्रेत्यांना बसस्थानकावरील अधिकारी हटकतही नाहीत.  त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. याविषयी आगारप्रमुखांना सांगितल्यावर त्यांनी ‘आमच्याकडे तक्रार आल्यावरच आम्ही कारवाई करतो’, असे दायित्वशून्य उत्तर दिले. (ही प्रवाशांप्रतीची कमालीची दायित्वशून्यता आहे. यामुळे विक्रेते आणि अधिकारी यांचे आर्थिक साटेलोटे तर नाही ना ? अशी कुणाला शंका आल्यास नवल ते काय ? – संपादक)

२. या बसस्थानकावरील शौचालयांची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याविषयी स्थानकावरील अधिकार्‍यांना विचारले असता ‘तिकीटाच्या दरात २ रुपयांची वाढ केल्यावर स्वच्छतेसाठी नवीन कंत्राटदाराला काम दिले जाईल’, असे उत्तर दिले.

३. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी खड्डे आहेत.

४. ‘नो पार्किंग’च्या (‘वाहने उभी करू नका’ या) फलकाच्या पुढेच दुचाकी आणि चारचाकी गाड्या लावण्यात आल्या होत्या. (असे करणार्‍या या खासगी वाहनचालकावर दंड का आकारला जात नाही ? – संपादक)

अयोग्य ठिकाणी उभी केलेली वाहने

अन्य असुविधा

१. ‘हिरकणी कक्ष कुठे आहे ?’, याविषयीचा फलकही नसल्याने प्रवाशांना त्याविषयी कळू शकत नाही.

२. बसस्थानकातून गाड्या वेळेत न सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात बराच वेळ बसगाड्यांची वाट पहात उभे रहावे लागते, असे प्रवाशांनी सांगितले.

३. प्रथमोपचार कक्ष किंवा प्रथमोपचार पेटी यांची सुविधा इथे कुठे दिसली नाही. अग्नीशमन यंत्रणेचे सिलिंडर गॅस भरण्यासाठी नेल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

४. चालक-वाहक विश्रांती कक्षही सुस्थितीत नाही.

५. गाडी फिरवायला जागा नसल्याने एका फलाटावर गाडी विरुद्ध दिशेला तोंड करून लावली जाते. त्यामुळेही प्रवाशांची गैरसोय होते.

६. परिसरात टाईल्स लावलेली छोटी खाेली आहे. तिथे पूर्वी मंदिर होते किंवा काय ते समजू शकले नाही. त्याविषयी उत्तर देण्यास अधिकार्‍यांनी टाळाटाळ केली.

परिसरात असलेली छोटी बंद खोली

७. स्थानकात रात्रीच्या वेळी प्रवाशांपेक्षा अनधिकृतपणे झोपणार्‍यांची संख्या अधिक असते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या समस्येसंदर्भात येथील कर्मचार्‍यांनी हतबलता व्यक्त केली.

यापूर्वी या परिसरात रिकाम्या असलेल्या बसमध्ये अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. बसस्थानकाच्या स्थितीविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अधिकार्‍यांना विचारणा केली असता ‘शहरातील हे महत्त्वाचे स्थानक नवीन स्वरूपात, आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे करण्याची आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले.

बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची प्राथमिक सुविधा नसल्यास एस्.टी. महामंडळाकडे पुढील लिंकवर तक्रार नोंदवा !
https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’  

-बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !

आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा !


हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !


नागरिकांना आवाहन !

‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे.

सूचना नोंदवा !

वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा !