कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar

  • कर्नाटकातील नोणविनकेरे मठात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पूजा केल्यानंतर केले वक्तव्य

  • राजकारणापेक्षा दैवी भक्तीच माझ्यासाठी महत्त्वाची !

काडसिद्धेश्वर मठाला भेट दिलेल्या प्रसंगी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

तुमकुरू (कर्नाटक) – जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असलेल्या नोणविनकेरे येथील काडसिद्धेश्वर मठाला भेट देऊन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विशेष पूजा केली. या वेळी त्यांच्या नुकत्याच झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमातील धार्मिक वादांवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मी हिंदु शास्त्रानुसारच शपथ घेतली आहे, तसेच माझ्यासाठी केवळ सत्ता किंवा राजकारण महत्त्वाचे नाही. भक्त आणि भगवंत यांच्यात संवाद घडवून आणणारी पवित्र केंद्रे, म्हणजेच मंदिरे होत. आपल्या राज्यात माझे नाव पालटणे कुणाला तरी शक्य आहे का ? किंवा आपला धर्म सोडणे शक्य आहे का ? कोणत्याही कारणास्तव धर्म सोडता येणार नाही.

आधी मी मठाचा परम भक्त, नंतर राजकारणी ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मी एक राजकारणी असण्याआधी मठाच परमभक्त आहे. मी येथे एक मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. मुख्यमंत्रीपद नंतर, आधी मी या मठाचा एक सामान्य भक्त आहे. आधी भक्त म्हणून येऊन मी देवाला प्रार्थना केली आहे. हे भक्त आणि भगवंत यांच्यातील पवित्र नाते आहे. राजकारणापेक्षा दैवी भक्तीच माझ्यासाठी महत्त्वाची आहे. माझे आणि कर्नाटक राज्यातील जनतेचे चांगले व्हावे, अशी विशेष प्रार्थना मी या वेळी केली. गेली २४ वर्षे मुख्यमंत्री मठात जातात.

सामान्यतः नामकरण, उपनयन यांसह कोणत्याही शुभकार्यात आपापल्या धर्माच्या पीठाच्या प्रमुखांना बोलावून त्यांचे आशीर्वाद घेणे, ही आपली संस्कृती आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्याच्या हिताचे रक्षण करण्याची एवढे मोठे दायित्व स्वीकारल्यानंतर मला सर्व धर्मांच्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद हवे आहेत; म्हणूनच मी सर्व धर्माच्या गुरूंना आमंत्रित करून हिंदु शास्त्रानुसार शपथ घेतली, असे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले.

संपादकीय भूमिका

काँग्रेसवासी असूनही हिंदु धर्माप्रती आदर आणि श्रद्धा उघडपणे व्यक्त करणे, हे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे वैशिष्ट्य आहे. आता त्यांनी हिंदुहितदक्ष मुख्यमंत्री म्हणून हिंदु धर्मावरील आघातही रोखावेत, हीच हिंदूंची अपेक्षा !