Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अजब मागणी !

  • गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी !

हातभट्ट्या अधिकृत करा- रामदास आठवले

भिवंडी – हातभट्टीची दारू प्यायल्याने आजवर सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे १८ ते १९ जणांचा मृत्यू झाला. कामगार लोक मेहनत करून कुटुंब सांभाळतात. ताणतणावाच्या प्रसंगात ते हातभट्टीची दारू पितात. पोलिसांनी कितीही धाडी घातल्या, तरीही हातभट्ट्या चालूच असतात. एका ठिकाणची हातभट्टी बंद असली, तरी दुसर्‍या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळे ते कधीच बंद होत नाही. यापेक्षा हातभट्ट्या अधिकृत करा, यातून सरकारला महसूल मिळेल, तसेच गोरगरीब नागरिकांचे प्राण वाचतील, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारला उद्देशून केले. ते भिवंडीत एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना पत्रकारांशी बोलत होते.

‘विषारी दारू कधीपर्यंत पाजता ? गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (दारूबंदी उठवली गेली, तर ज्या भागांत दारूबंदी लागू केली आहे, तेथील धोरण किंवा तत्त्वे यांना तिलांजली दिल्यासारखे होईल ! – संपादक) ‘मोहाच्या दारूला कायदेशीर करा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न, मृत्यू अशा वेळेस लोक मोहाची दारू पितात’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे. यातून व्यसनाधीनता वाढून नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? हा विचार नेते का करत नाहीत ?
  • जनतेसाठी अपायकारक ठरणारे नव्हे, तर जनतेला काय आवश्यक आहे, याची पूर्तता करणारे शासनकर्ते हवेत !