Thiruvalluvar Saffron Row : भगवे वस्त्र आणि रुद्राक्षाची माळ घातलेल्या तमिळनाडूतील कवी तिरुवल्लुवर यांच्या चित्रावरून वाद !

मंत्र्याकडून चित्रावर टीका

मंत्री अरुण राज

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्त्ववेत्ते तिरुवल्लुवर यांच्या चेन्नईतील गिंडी येथील ‘तमिळनाडू लोक भवना’त ‘तिरुवल्लुवर दिवस’ सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी त्यांचे भगव्या वस्त्रातील चित्र प्रदर्शित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. तिरुवल्लुवर यांना भगवे वस्त्र परिधान केलेले, गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेले आणि कपाळावर पवित्र भस्म लावलेले दर्शवणारे असे हे चित्र होते. तमिळनाडूचे मंत्री अरुण राज यांनी या चित्राची निंदा केली आहे. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवले होते.

जोसेफ विजय यांच्या मंत्रीमंडळातील एकही मंत्री उपस्थित नाही !

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या मंत्रीमंडळातील कोणताही मंत्री लोक भवनात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. यामुळे या सोहळ्याविषयी आणि कवीच्या चित्राविषयी चालू असलेल्या वादावर राजकीय चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत. (ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचे मंत्री कधीतरी हिंदु धर्माच्या संदर्भातील कार्यक्रमाला उपस्थित रहातील का ? – संपादक)

तिरुवल्लुवर यांना कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित रंगाशी जोडणे चुकीचे ! – मंत्री अरुण राज

(मंत्री महाशय तमिळनाडूतील १६ व्या शतकातील सुफी संत ‘नागोर अंडावर’ (हजरत सैय्यद शाहुल हामिद) यांना इस्लामऐवजी सर्व धर्मांशी जोडण्याचे धाडस का दाखवत नाहीत ? – संपादक)

अरुण राज म्हणाले की, लोक भवन किंवा कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक संस्थेत तिरुवल्लुवर यांना भगव्या वस्त्रात चित्रित करणे अयोग्य आहे. तिरुवल्लुवर हे सर्व मानवजातीचे आहेत. तिरुवल्लुवर यांना कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित रंगाशी जोडणे हे कवीच्या जागतिक दर्शनाच्या भावनेच्या विरुद्ध आहे. तिरुवल्लुवर यांना एका रंगात बांधण्याचा प्रयत्न म्हणजे समुद्राला भांड्यात बंद करण्यासारखे आहे. त्यांचे ‘तिरुक्कुरल’ मानवी जीवनाला मार्गदर्शन करणार्‍या जागतिक नैतिक मूल्यांबद्दल आणि तत्त्वांबद्दल बोलते, न की कोणत्याही एका धर्माच्या सिद्धांतांबद्दल, असे ते म्हणाले. काही गटांवर कवीच्या प्रतिमेचा गैरवापर करून राजकीय लाभ उठवल्याचा आरोपही त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूत कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरी ते हिंदूंच्याच विरोधात असते, हाच इतिहास आणि वर्तमान आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात आणून देते !