प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार !

मंत्रालयात कार्यरत होणार ‘भारत फॉरकास्ट सिस्टीम’ !

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई 

मुंबई, २७ मे (वार्ता.) – यापुढे प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार आहे. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये पावसाळ्यापूर्वी ‘भारत पूर्वानुमान प्रणाली’ (भारत फॉरकास्ट सिस्टीम) चालू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील अतीवृष्टी, वादळ यांविषयीची माहिती प्राप्त होणार आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने यंत्रणेला मोठे साहाय्य होणार आहे.

श्री. प्रीतम नाचणकर

भारतीय हवामानशास्त्र आणि पुणे येथील भारतीय उष्ण कटीबंधीय हवामान शास्त्र संस्था या प्रणालीशी संलग्न असणार आहेत. यापूर्वी एखाद्या १२ किलोमीटर भागातील हवामानाचे अनुमान प्राप्त होत होते. भारत पूर्वानुमान प्रणालीद्वारे मात्र आणखी सखोल म्हणजे ६ किलोमीटरपर्यंत जवळ जाऊन हवामानाचे अनुमान घेता येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचे कर्ज ! 

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेकडून राज्यशासनाला ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. याद्वारे आपत्ती क्षेत्रांचे सर्वेक्षण, राज्यातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रांचे आधुनिकीकरण आदी कामे केली जाणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी ५३२ कोटी रुपये निधी असणार आहे. या अंतर्गत पन्हाळा आणि ज्योतिबा डोंगर येथील भूस्खलनाविषयी खासगी आस्थापनांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.