मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील अशुद्ध भाषेतील फलक प्रशासनाने हटवला !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !

अशुद्ध मराठी भाषेतील सूचनाफलक

मुंबई, २७ मे (वार्ता.) – मंत्रालयात येणार्‍या अभ्यागतांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सूचनाफलकावरील लिखाण अशुद्ध आणि अर्थबोध न होणारे होते. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये २६ मे २०२६ या दिवशी ‘मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच मराठीचे धिंडवडे !’, ‘अभ्यागतांसाठीच्या सूचनाफलकावर मराठीतील एक वाक्यही धड नाही !’, या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर २७ मे या दिवशी प्रशासनाकडून हा फलक हटवण्यात आला आहे. हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री उदय सामंत आणि मराठी भाषा विभाग यांना त्यांच्या ‘एक्स’ खात्यांना टॅग करून सूचित करण्यात आले होते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त आल्यानंतर अन्य वृत्तपत्रांनीही ही बातमी प्रसिद्ध केली.

काय लिहिले होते सूचनाफलकावर ?

मंत्रालयाच्या ‘गार्डन गेट’ या प्रवेशद्वारावर ‘मंत्रालय प्रवेश करीता ०२.०० वाजल्यांचे रांग येथुन चालु’ अशी सूचना असल्याचा फलक लावण्यात आला होता. या सूचनाफलकावर असलेला एक शब्दही मराठी भाषेत धडपणे लिहिण्यात आला नव्हता.

दिनांक २६ मे च्या ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त →

(चित्रावर क्लिक करा)

मराठी जनतेचाही कानाडोळा !

फलक हटवलेले मंत्रालयातील हेच ते स्थान

राज्यात मराठी भाषेच्या शुद्धीकरणाविषयी कार्यरत असलेला मराठी भाषा विभागही याच मंत्रालयात कार्यरत आहे. राज्यभरातून मंत्रालयात नियमित येणार्‍या शेकडो नागरिकांच्या वाचनात हा फलक येत होता. असे असूनही अर्थबोध होत नसलेला फलक मागील अनेक दिवसांपासून येथे होता. मराठी भाषा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनही या फलकाकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे मराठी भाषेविषयी उदासीनता दाखवली जात होती. हा सर्व प्रकार ‘सनातन प्रभात’मधील वृत्तामध्ये देण्यात आला होता.

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात येणार्‍या सूचनांविषयी कार्यपद्धत असावी !

मंत्रालयासह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारच्या सूचना लावलेल्या असतात. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात भाषाशुद्धीसाठी मराठी अधिकारीही नियुक्त असतो. असे असूनही अनेक शासकीय सूचनांतील लिखाण व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असते. मराठी ही राज्यभाषा असतांना आणि मराठी भाषेचे विविध कार्यक्रम घेण्यासाठी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये व्यय करतांना शासकीय कार्यालयांतील सूचना अयोग्य असणे, ही एकप्रकारे मराठीची थट्टाच होय. हा एकप्रकारे प्रशासनाकडून मराठी भाषेचा होत असलेला उपहास आहे अथवा मराठी भाषेविषयी प्रेम असल्याचे ढोंग आहे, असेच म्हटले पाहिजे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात येणार्‍या सूचना भाषेच्या आणि वाक्यरचनेच्या दृष्टीने योग्य असाव्यात, यासाठी सरकारने कार्यपद्धत निश्चित करणे आवश्यक आहे.