Bangladeshi Illegal Migrants : बंगालमध्ये भाजप सरकारच्या भीतीने बांगलादेशी पुन्हा त्यांच्या देशात पळू लागले

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सीमेवर १०० हून अधिक घुसखोर कुटुंबांची गर्दी

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होताच बांगलादेशी घुसखोरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हे लोक पुन्हा बांगलादेशात परतत आहेत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सीमेवरील हाकिमपूर तपासणी चौकीवर १०० हून अधिक बांगलादेशी घुसखोर कुटुंबांसह बांगलादेशात परतण्यासाठी जमा झाले आहेत.

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांना आदेश दिला आहे की, कुठेही एखादा बांगलादेशी घुसखोर सापडल्यास त्याला थेट सीमा सुरक्षा दलाच्या स्वाधीन करावे. आता त्यांना न्यायालयात नेले जाणार नाही, तर थेट बांगलादेशात परत पाठवले जाईल. यामुळेच बांगलादेशी घाबरले आहेत.

भाजप आमदार बिशाल लामा या घुसखोरांविषयी म्हणाले की, मागील सरकारने बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना आश्रय दिला होता; कारण ती त्यांची मतपेटी होती. आता त्यांना समजले आहे की, योग्य कागदपत्रांविना कोणत्याही देशात प्रवेश करण्याची किंमत काय असते ? ज्या अनेक लोकांची नावे मतदार सूचीच्या सखोल पुनरावलोकनाद्वारे काढून टाकण्यात आली होती, ते आता पळून जात आहेत किंवा त्यांना हद्दपार केले जात आहे. चौकशीमुळे अशा अनेक लोकांची नावे समोर येतील, ज्यांना मागील सरकारने आश्रय दिला होता. पूर्वी तृणमूल काँग्रेस निवडणुकीत फेरफार करायची, मतांची लूट करायची, जनतेला त्यांच्या अटींवर मतदान करण्याची संधी क्वचितच मिळायची.

लवकर पळून जा, आम्हाला तुम्हाला कारागृहात जेवण खाऊ घालायचे नाही !

सीमेवर जमलेल्या बांगलादेशी घुसखोरांवर मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचे विधान

आम्हाला या घुसखोर बांगलादेशींना कारागृहात जेवण खाऊ घालायचे नाही, आम्ही त्यांच्यावर पैसे का वाया घालवू ? मी त्यांना सांगतो की, त्यांनी लवकर पळावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सीमेवर बांगलादेशात परत जाणार्‍या घुसखोरांवरून केली.

शुभेंदु अधिकारी शासनाला तंतोतंत लागू पडणारे संस्कृतमधील हे प्रसिद्ध सुभाषित !

दुर्जन प्रथमं वन्दे सज्जनं तदनन्तरम् ।
मुखप्रक्षालनात्पूर्व गुदप्रक्षालनं यथा ॥

असे संस्कृतमधील प्रसिद्ध सुभाषित आहे. उपरोधिकपणे लिहिलेल्या या सुभाषिताचा अर्थ आहे – जसे सकाळी मुखप्रक्षालनापूर्वी (तोंड धुण्यापूर्वी) गुदद्वार स्वच्छ करतात, तसेच मी प्रथम दुर्जन माणसाला आणि नंतर सज्जन माणसाला वंदन करतो. बंगालमध्ये सध्या बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात उघडलेली मोहीम हा त्याचाच प्रकार होय.