(म्हणे) ‘पाकच्या विरोधात दुःसाहस केले, तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील !’ – Asim Munir

पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांची भारताला धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आमच्या शत्रूंनी हे लक्षात ठेवावे की, भविष्यात पाकिस्तानविरुद्ध कोणतेही दुःसाहस करण्याचा प्रयत्न केला गेला, तर युद्धाचा प्रभाव मर्यादित रहाणार नाही, तर तो अत्यंत व्यापक, धोकादायक, दूरगामी आणि वेदनादायक असेल, अशी चेतावणी पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दिली. ते रावळपिंडीतील सैन्याच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या वेळी वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू आणि नौदलप्रमुख ॲडमिरल नावेद अश्रफ यांचीही उपस्थिती होती.

(म्हणे) ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचा पराभव झाला ! – जनरल मुनीर

जनरल मुनीर यांनी असा दावा केला की, गेल्या वर्षी ६, ७ आणि १० मेच्या मध्यरात्री पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक सीमा यांचे उल्लंघन करून शत्रूने आमच्या संकल्पाची परीक्षा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला पूर्ण राष्ट्रीय एकता अन् सैनिकी बळाने उत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंमधील हा संघर्ष केवळ २ देश किंवा सैन्यांमधील पारंपरिक युद्ध नव्हते, तर प्रत्यक्षात ते २ विचारसरणींमधील निर्णायक युद्ध होते, यामध्ये अल्लाच्या कृपेने सत्याचा विजय झाला आणि असत्याचा पराभव झाला.वर्ष २००१, २००८, २०१६ आणि २०१९ मधील ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्स’ हा पुरावा आहे की, भूतकाळातही भारताने पाकिस्तानवर बेकायदेशीर युद्ध लादण्याचे आणि आरोप, अतिशयोक्ती, युद्धखोरी आणि मर्यादित आक्रमकतेच्या दिशाभूल करणार्‍या कल्पनेद्वारे संकुचित, दीर्घकालीन राजकीय अन् सैनिकी उद्दिष्टे साध्य करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले आहेत. पाकिस्तानच्या शत्रूंनी भविष्यात अशी कोणतीही हालचाल केली, तर युद्धाचे परिणाम मर्यादित रहाणार नाहीत.

संपादकीय भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकची जी स्थिती झाली, ती पहाता केवळ पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्यासाठी, तिला अंधारात ठेवण्यासाठीच अशी विधाने मुनीर करत आहेत, असेच म्हणावे लागेल !