देशप्रेमाचे स्फुलिंग चेतवणारे ‘वन्दे मातरम्’ !

‘वर्ष १८७६ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत ‘वन्दे मातरम्’ हे गीत रचले. पुढे वर्ष १८८२ मध्ये त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताला स्थान मिळाले. त्यानंतर ते अधिकच प्रसिद्धीस आले. इतके की, लॉर्ड कर्झनने तर या गीताचे वर्णन ‘ब्रिटीश राजवटीविरुद्धचे सर्वांत प्रबळ राष्ट्रीय प्रतीक’ असे केले होते ! कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला त्यांचा स्वर दिला. भगतसिंह, बटुकेश्वर दत्त आणि इतर अनेक क्रांतीकारकांसाठी हे गीत स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलीदान देण्याची प्रेरणा देणारे एक ज्वलंत स्रोत म्हणून उदयास आले. एवढेच नाही, तर हे गीत लोकमान्य टिळक, योगी अरविंद घोष आणि त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांसाठी अन् देशाच्या विविध प्रदेशांमधील जनतेत एकतेची भावना रुजवणारा एक अत्यंत शक्तीशाली दुवा ठरले.

 वर्ष १९०५ मध्ये प्रशासकीय सोयीचे कारण देत लॉर्ड कर्झनने मुसलमानबहुल पूर्व बंगाल आणि हिंदुबहुल पश्चिम बंगाल या दोन भागांमध्ये बंगालचे विभाजन करण्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा एकदा ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या निषेधार्थ ‘अखंड भारता’च्या भावनेचा सर्वांत तीव्र आविष्कार म्हणून ‘वन्दे मातरम्’ हे गीत समोर आले. शेवटी ही योजना कार्यवाहीत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली आणि वर्ष १९११ मध्ये बंगालच्या विभाजनाचा निर्णय रहित करण्यात आला.

१. काँग्रेसच्या बैठकीत ‘वन्दे मातरम्’ला दोन ओळींमध्ये मर्यादित करण्याचा निर्णय

पुढे वर्ष १९३७ मध्ये भरलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत काही धर्मांध घटकांनी या गीतात ‘इस्लामविरोधी’ सूर असल्याचे भासवले आणि त्यात अंतर्भूत असलेल्या देवी लक्ष्मी, दुर्गा आणि काली यांच्या रूपकांवर आक्षेप घेतला. त्यावर राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये या गीताच्या केवळ पहिल्या दोन ओळीच गायल्या जाव्यात, असा तोडगा काढण्यात आला; कारण त्या पूर्णपणे राष्ट्रवादी स्वरूपाच्या असून त्यात कोणत्याही विशिष्ट धर्माचा उल्लेख नव्हता. त्यानंतर २४ जानेवारी १९५० या दिवशी ‘जन-गण-मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून अन् ‘वन्दे मातरम्’ला (त्याच्या पहिल्या दोन ओळींसह) राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा देण्यात येत आहे, अशी घोषणा डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेच्या शेवटच्या अधिवेशनात केली.

२. ‘वन्दे मातरम्’ संपूर्ण स्वरूपात स्वीकारण्यात हिंदू संघटनाचा अभाव

विशेष म्हणजे, या गीताच्या मूळ रचनेतच सर्वसमावेशक भारतीय तत्त्वज्ञान अंतर्भूत आहे. यातून मातृभूमीप्रतीची निष्ठा, निसर्गाची उपासना, शक्ती आणि शांती यांचा सुरेख संगम, तसेच भक्ती आणि राष्ट्रीय अस्मिता यांसारख्या मूल्यांचे दर्शन घडते. वेदांमध्येही ‘पृथ्वी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे’, असेच म्हटले आहे. याचा अर्थ असा की, ‘ही भूमी आमची माता आहे आणि आम्ही तिचे पुत्र आहोत.’ (‘शौनक संहिता’ आणि ‘अथर्ववेद’ – पृथ्वी सूक्त) याच सुरात सूर मिसळत दीनदयाळ उपाध्याय म्हणतात, ‘भारतीय परंपरेत भक्ती ही केवळ ईश्वरापुरतीच मर्यादित नसते; तर राष्ट्र आणि समाज हेही ईश्वराप्रमाणेच पूजनीय असू शकतात, अशी शिकवण ही परंपरा आपल्याला देते. अशा प्रकारे राष्ट्र हे केवळ एक राजकीय एकक नाही, तर ते एक सजीव, भावनामय आणि पालनपोषण करणारी माता म्हणूनही उभे रहाते. त्यामुळेच राष्ट्र्रभक्ती ही केवळ भावनिक श्रद्धेची अभिव्यक्ती नसून ती प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आणि नैतिक दायित्वही ठरते.’

खेदाची गोष्ट अशी की, राष्ट्रीय नेतृत्वामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे, तसेच विशेषतः हिंदु समाज एकजुटीने पुरेसा सक्षम नसल्यामुळे (ज्यामुळे तो  नेतृत्वावर आपला प्रभाव पाडू शकला असता.) ‘वन्दे मातरम्’ हे गीत त्याच्या मूळ आणि संपूर्ण स्वरूपात राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले जाऊ शकले नाही.

३. साम्यवाद्यांची फुटीरतावादी विचारसरणी

४ मे २००४ या दिवशी ब्रसेल्स येथे साम्यवादी विचारसरणीवर आधारित एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतातील एका वक्त्याने म्हटले, ‘बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीत रचलेले ‘वन्दे मातरम्’ हे गीत हिंदु राष्ट्राचा सिद्धांत मांडणारे आहे.’ हे दुसरे तिसरे काही नसून केवळ एक कपटी कारस्थान होते, ज्याच्या आडून देशाच्या फाळणीचे समर्थन करण्यासाठी एक सबब  पुढे करता येईल. साधारणपणे वर्ष १९३० च्या सुमारास कॉ. मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांच्या  लेखात असे स्पष्टपणे नमूद केले होते, ‘भारतातील विविध प्रदेशांमध्ये रहाणारे लोक त्या त्या प्रदेशालाच त्यांची ‘मातृभूमी’ समजतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र राष्ट्रीयत्व बहाल केले जावे, जेणेकरून त्यांना स्वायत्त राज्य स्थापन करण्याचा अधिकार मिळेल. जर त्यांची तशी इच्छा असेल, तर त्यांना खुद्द देशापासून वेगळे होण्याचा अधिकारही प्राप्त होईल.’

४. देशद्रोह्यांच्या समर्थकांना ‘वन्दे मातरम्’चे देशप्रेम अमान्य !

पाकिस्तानच्या चिथावणीवरून घडवून आणलेल्या मुंबई साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात टायगर मेमन याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आणि तो दोषी असल्याचे सिद्ध झाले. परिणामी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्या अंत्ययात्रेत मुंबईच्या रस्त्यांवर सहस्रो लोकांचा जमाव लोटला होता. तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि मुसलमान धर्मगुरु यांच्यापैकी कुणीही या कृत्याचा निषेध करणारी प्रतिक्रिया दिली नाही; परंतु त्यानंतर वर्ष २००४ मध्ये ५४ मुसलमान लोकांना वाळीत टाकण्यात आले आणि त्यांचे लग्नही रहित होत असल्याचे घोषित करण्यात आले. तेथे त्यांचा गुन्हा हा होता की, त्यांनी ‘वन्दे मातरम्’ गीत हे काही इस्लामविरोधी नाही, अशी भूमिका घेतली होती. हे स्पष्टच आहे की, समाजाच्या धार्मिक व्यवहारांचे नेतृत्व करणार्‍या लोकांसाठी बंडखोर आणि देशद्रोही घटक स्वीकारार्ह आहेत; परंतु ‘वन्दे मातरम्’चे समर्थन करणारे लोक मात्र त्यांना मान्य नाहीत !’

– श्री. राजेश पाठक, वरिष्ठ स्तंभलेखक आणि स्थापत्य अभियंता, भोपाळ, मध्यप्रदेश.