वाराणसी येथील ज्ञानवापीजवळील भिंतीवर भगव्या रंगात रेखाटण्यात आलेल्या मधुबनी चित्राला मुसलमानांचा विरोध

काशी विश्‍वेश्‍वर मंदिर आणि ज्ञानवापी मशीद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीमध्ये शुक्रवारच्या नमाजापूर्वी ज्ञानवापी आणि काशी विश्‍वनाथ मंदिर यांच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ च्या बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्ञानवापीजवळील एका भिंतीवर मधुबनी शैलीतील चित्र रेखाटण्यात आले होते. त्यावरून हा तणाव निर्माण झाला; मात्र तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौर्‍यापूर्वी हे चित्र रेखाटण्याचे काम करण्यात आले होते.

जरी नमाजाच्या वेळी कोणताही विरोध झाला नाही आणि नमाजपठण शांततेत पार पडले, तरी काही लोकांचे म्हणणे होते की, पूर्वी जी स्थिती होती, ती पालटण्याची आवश्यकता नव्हती. अशा कामांमुळे सामाजिक सलोख्यावर परिणाम होऊ शकतो.

भूमी वक्फची असल्याचा दावा करत तक्रार प्रविष्ट

वाराणसीचे ‘मुफ्ती-ए-बनारस’ मौलाना अब्दुल बातिन नोमानी यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, ही भूमी वक्फची आहे आणि त्यावर ज्ञानवापी समितीच्या अनुमतीविना चित्र रेखाटण्यात आले आहे. या संदर्भात अनेकदा अधिकार्‍यांशी संवाद साधला; पण कुणीही दखल घेतली नाही. मुफ्तींनी लेखी तक्रार प्रविष्ट केली असून चित्र हटवण्यासाठी ते पुन्हा अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.
पोलीस उपायुक्त (काशी) गौरव बन्स्वाल यांनी सांगितले की, चित्रामध्ये काहीही चुकीचे किंवा आक्षेपार्ह नाही. हे केवळ एक सांस्कृतिक चित्र आहे. ही भिंत ज्ञानवापीच्या हद्दीत येत नाही. जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

ज्ञानवापीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय येईपर्यंत मुसलमानांकडून अशा प्रकारच्या कुरापती चालूच रहाणार आहेत !