जिहादी आतंकवाद्यांनी नष्ट केलेल्या मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन !

मंदिराची भूमी

कुपवाडा (काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी कुपवाडातील चांदीगाम येथील नष्ट केलेल्या एका मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर प्रशासनाकडून पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन करण्यात आली, अशी माहिती भाजपच्या जम्मू-काश्मीर शाखेने ‘एक्स’वरील  पोस्टद्वारे दिली. स्थानिक पातळीवर याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

१९९० च्या दशकात जिहादी आतंकवादामुळे ज्या कुटुंबांना काश्मीर खोर्‍यातून पलायन करावे लागले होते, त्या कुटुंबांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता.

जिहादी आतंकवाद्यांनी उद्ध्वस्त केले होते मंदिर आणि आश्रम !

‘काश्मिरी हिंदु’ नावाच्या एका ‘फेसबुक पेज’वर दिलेल्या माहितीनुसार, वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मंदिर आणि आश्रम यांवर ताबा मिळवला होता; त्यांनी केवळ या मंदिराची लुटालूट करून त्याला आग लावली नाही, तर तेथील सर्व वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. आता याच पवित्र स्थळी भूमीपूजन (पायाभरणी समारंभ) पार पडले असून लवकरच तेथे एक भव्य मंदिर आणि आश्रम याची उभारणी केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

यासह या मंदिराचे आणि हिंदूंचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण करण्याचीही हमी सरकारने दिली पाहिजे !