छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुणीही अपमान करू शकत नाही ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सध्याचा वाद निरर्थक आहे. या देशात त्यांचा कुणीही अपमान करू शकत नाही. ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वर्ष १९७९ मध्ये लिहिले गेले असून त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करायचे, हे शुद्ध असामाजिक, असंवेदशील कृत्य आहे. आक्षेप घेणार्‍यांनी पुस्तक वाचले आहे कि नाही ते माहिती नाही. आंदोलनर्त्यांनाही ते नेमके आंदोलन कशासाठी करत आहेत ? हे माहिती नाही. केवळ कुठले तरी सूत्र पकडायचे, वाद उभा करायचा आणि चर्चेत रहायचे, हा प्रयत्न योग्य नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मीरा रोड प्रकरणात जिहादच्या नावाखाली झालेल्या आक्रमणाचे सखोल अन्वेषण होईल ! 

ठाणे येथील मीरारोड परिसरात अन्सारी नावाच्या कट्टरपंथियाने सुरक्षारक्षकांवर आक्रमण केले. या संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पकडलेल्या तरुणामध्ये साहित्य, पुस्तके, सामाजिक माध्यमे या माध्यमेंतून टोकाची धार्मिक कट्टरता निर्माण झाली होती. त्याला जिहादच्या नावाखाली अन्य धर्मियांवर आक्रमण करायचे होते. त्याच्या रहात्या घरातून काही आक्षेपार्ह पुस्तके आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचे पूर्ण कुटुंब अमेरिकेत रहात होते. तो अलीकडेच भारतात परत आला आहे. याचे अधिक अन्वेषण आता आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा करत आहेत. या अन्वेषणातून या कट्टरपंथीय तरुणाच्या मागे कोणती टोळी आहे का ? कोणते षड्यंत्र आहे का ? याचा शोध घेत आहोत. त्याच्या सहवासात येऊन अजून कुणी असे धार्मिक कट्टर झाले आहे का ? याचाही शोध घेण्यात येत आहे.’’