Vedic Village : इंटरनेट आणि वीज यांखेरीज जगणारे वैदिक गाव : आंध्रप्रदेशातील कूर्मग्राम !

कृष्णभक्तीत रममाण रहाण्यासाठी स्वीकारली १८ व्या शतकातील जीवनशैली

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – येथून ११० किमी अंतरावर असलेले श्रीकाकुलम् जिल्ह्यातील कूर्मग्राम या अवघ्या ५६ लोकांच्या गावात आजही ३०० वर्षांपूर्वीची, म्हणजे १८ व्या शतकातील जीवनशैली आचरली जाते. त्यामुळे आजही तेथे  वीज किंवा इंटरनेट, अशा सुविधा नाहीत. येथील लोकांचा दिवस ब्राह्ममुहूर्तावर पहाटे ३.३० वाजता चालू होतो, तर सायंकाळी ७.३० वाजता लोक झोपी जातात. विशेष म्हणजे येथील लोकांची आधुनिक सुविधा वापरण्याची क्षमता असली, तरी त्यांनी स्वतःहून भौतिक सुख-सुविधांचा त्याग केला आहे. येथे लोक साधे जीवन आणि उच्च विचार या तत्त्वांवर जगतात. गावात १४ कुटुंबे आणि काही कृष्णभक्त रहातात, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कृष्णभक्तीला समर्पित केले आहे.

गावातील विशेषत्व दर्शवणार्‍या गोष्टी !

१. घरांचे बांधकाम : या गावातील घरे पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली आहेत. लोक स्वत:च्या हातांनीच घरे बांधतात. हे गाव ६० एकर परिसरात वसलेले आहे. कूर्मग्राम गावातील घरे ९ व्या शतकातील श्री मुखालिंगम् मंदिराच्या धर्तीवर बांधली आहेत.

२. जेवण : कूर्मग्राममध्ये कोणत्याही घरात गॅस नाही; कारण येथे चुलीवर स्वयंपाक केला जातो. अन्नासाठी लागणार्‍या भाज्या आणि धान्यही ते स्वतःच पिकवतात. येथे येणार्‍या पाहुण्यांना ते भोजनही देतात. त्यास ते ‘प्रसादम्’ म्हणतात.

३. केवळ १ भ्रमणभाष : गावात कुणाकडेही आधुनिक साधने अथवा उपकरणे नाहीत. संपूर्ण गावात केवळ एक साधा भ्रमणभाष आहे. कुणाला बाहेर संपर्क साधायचा असल्यास त्याचाच वापर केला जातो.

४. गुरुकुलाचे वैशिष्ट्य : नटेश्वर नरोत्तम दास हे गावातील गुरुकुलाचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या तत्त्वांनुसार आम्ही जीवन जगतो. येथील गुरुकुलात गणित, विज्ञान, संस्कृत, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, कला आणि महाभारत यांचे शिक्षण दिले जाते. मुलांकडून महाभारत आणि इतिहास यांवर आधारित नाटिकाही सादर केल्या जातात.

५. मोठ्या नोकरीचा त्याग करणारे गावकरी : या गावात रहाणारे राधाकृष्णा चरण दास यांनी कृष्णभक्तीसाठी स्वत:ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडली. त्यांनी सांगितले की, आपले पूर्वज ३०० वर्षांपूर्वी जसे जीवन जगत होते, तसेच मीही जगतो.