मुंबईला बाहेरचे कुणी वेठीस धरू शकत नाही ! – मनसे

संदीप देशपांडे, मनसे

मुंबई – रिक्शा आणि टॅक्सी चालकांना करण्यात आलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे अमराठी वाहनचालकांनी संपावर जाण्याची चेतावणी दिली आहे. या सूत्रावरून आक्रमक झालेल्या मनसेनेही या संपावर जाणार्‍या चालकांवर पलटवार केला. ‘धमकी देणार्‍यांना मराठी माणसांनी धडा शिकवायला हवा. मुंबई आणि महाराष्ट्र यांना बाहेरचे कुणीही वेठीस धरू शकत नाही. तुमची ताकद आम्हाला ४ मेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबई येथून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे’, अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावले. ते माध्यमांशी बोलत होते.

चालकांना मराठी शिकवू ! – देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री

मुंबई, महाराष्ट्र येथे मराठीचा आग्रह होणे, मराठीला प्राथमिकता द्या सांगणे चुकीचे नाही. सरकारची भूमिका काय असेल, तर ‘वाद होऊ नये’ ही आमची भूमिका आहे. ज्या टॅक्सी, रिक्शा चालकांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवू.

व्यावसायिक क्षेत्रातील शिकलेले लोक तरी मराठी बोलतात का ? – संजय निरुपम, शिवसेना

श्री. संजय निरुपम

रिक्शा आणि टॅक्सी चालकांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा केली पाहिजे. त्यांनी मराठीतून संवाद साधला पाहिजे; पण त्यांची चाचणी घेऊ नका; कारण ते जास्त शिकलेले लोक नाहीत. जास्त शिकलेले लोक रिक्शा, टॅक्सी चालवणार का ? कॉर्पोरेटमध्ये काम करणारे रिलायन्स, बिर्ला या आस्थापनामध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का ? झोमॅटो, स्विगीवरून पार्सल घेऊन येणारे मराठीत बोलतात का ? असे प्रश्न शिवसेनेचे संजय निरुपम यांनी विचारले आहेत.