भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

महापरिषदेच्या वतीने देहली येथे होणार्‍या संत-महंतांच्या संमेलनाचे सनातन संस्थेला निमंत्रण

डावीकडून श्रीमती जयलक्ष्मी आणि स्वामिनी उन्मेष भारती यांना ‘सनातन प्रभात’विषयी माहिती देतांना श्री. अभिषेक पै

रामनाथी (गोवा) – भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक आणि कैलास मठाच्या प्रतिनिधी स्वामिनी उन्मेष भारती यांनी २४ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या बेंगळुरूच्या श्री राजराजेश्वरी मंदिर येथील रहिवासी आहेत.

त्यांच्यासमवेत कैलास मठाच्या अनुयायी श्रीमती जयलक्ष्मी उपस्थित होत्या. सनातनचे साधक श्री. अभिषेक पै यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म प्रसार कार्याची माहिती दिली.

स्वामिनी उन्मेष भारती यांचा सन्मान करताना अश्विनी कुलकर्णी

यानंतर झालेल्या एका सोहळ्यात सनातन संस्थेच्या साधिका अश्विनी कुलकर्णी यांनी स्वामिनी उन्मेष भारती यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून, तसेच सनातनचे ग्रंथ भेट देऊन  केला. ‘आश्रमात येऊन मला अतिशय आनंद झाला. आश्रम अतिशय सुंदर असून त्याला अतिशय चांगल्या प्रकारे ठेवले आहे’, असे गौरवोद्गार स्वामिनी उन्मेष भारती यांनी या मंगलप्रसंगी काढले. सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्यासह सनातनचे काही साधक या वेळी उपस्थित होते.

सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे संमेलनाचे निमंत्रण स्वीकारतांना

सर्व संतांच्या संघटनासाठी भारतीय संत महापरिषदेच्या वतीने बेंगळुरू येथे देशभरातील संत आणि महंत यांचे एक संमेलन झाले होते. तशाच प्रकारचे संमेलन देहली येथे १८ मे या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे निमंत्रण स्वामिनी उन्मेष भारती यांनी सनातन संस्थेला दिले. सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी निमंत्रण स्वीकारले. या वेळी त्यांनी पू. हजारे यांचा सन्मानही केला.

स्वामिनी उन्मेष भारती पू. पृथ्वीराज हजारे यांचा सन्मान करतांना

गुरुकृपा सातत्याने रहाण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करत रहावे ! – स्वामिनी उन्मेष भारती

या वेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतांना स्वामिनी उन्मेष भारती म्हणाल्या, ‘तरुणांमध्ये राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी क्षात्रतेज असते, परंतु त्यांच्यात ब्राह्मतेजही असले पाहिजे. साधना केल्यानेच ते प्राप्त होऊ शकते. ईश्वराची सेवा, सत्संग, नामजप यांचा जीवनात अंगिकार केल्यास व्यक्तीचा संपूर्ण विकास होतो. त्यामुळे आपण नेहमी गुरूंच्या चरणांशी राहिले पाहिजे. आपण गुरूंच्या चरणी आपले शिर अर्पण केले, तरी ते अल्पच आहे. आपण गुरूंकडे नेहमी सकाम गोष्टी मागतो; पण आपले दु:ख हे आपलेच कर्म असते. त्यामुळे ते आपल्यालाच भोगावे लागणार आहे. त्यामुळे गुरूंकडे आपण नेहमी दु:ख सहन करण्यासाठी बळ मागितले पाहिजे. अनेक जन्मांच्या पुण्याईने गुरूंचा सहवास मिळतो. गुरूंची आपल्यावर सतत कृपा रहावी, यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे.’