(म्हणे) ‘बाहेरच्या उपर्‍यांनी छत्रपतींवर बोलावे, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी

  • समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संवादाची कथा सांगितल्याने अमोल मिटकरी यांना पोटशूळ !

  • पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याविषयी अपशब्दाचाही वापर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी (डावीकडील)

मुंबई – बाहेरच्या उपर्‍यांनी महाराष्ट्रात यावे आणि छत्रपतींवर बोलावे, ही एक नवीन चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतपत बोलायचे धैर्य अशा मूर्खांमध्ये येते कुठून ? या बाबाला खरात बाबासमवेत उपचाराला पाठवायला हवे, अशा प्रकारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याविषयी अभद्र आणि अश्लाघ्य टिपणी करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी समाजमाध्यमातून व्यक्त झाले आहेत. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या गुरु-शिष्य संबंधांविषयी एक अत्यंत उद्बोधक कथा सांगून ‘छत्रपती समर्थांना अर्पण केलेले स्वराज्य हे त्यांनीच सांभाळायचे, अशी आज्ञा त्यांना समर्थांनी कशी केली ?’ याविषयीचा संवाद सांगितला आहे.

काय म्हणाले धीरेंद्रकृष्ण शास्त्री ?

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदासस्वामी यांच्याकडे गेले आणि मुकुट काढून ते म्हणाले, ‘‘अनेक लढाया लढलो; पण आता दया करा की, हे राज्य सांभाळा. तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो; मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आता आम्हाला विश्राम हवा आहे.’’ त्यावर हसत समर्थ रामदासस्वामी म्हणाले, ‘‘ठीक आहे, मी स्वीकार करतो; पण तुम्ही माझे कोण आहात ?’’, यावर छत्रपती म्हणाले, ‘‘मी तुमचा शिष्य आहे.’’ समर्थांनी विचारले, ‘‘मग शिष्याचे कर्तव्य काय ?’’ यावर छत्रपती म्हणाले, ‘‘जो गुरु आदेश देतील.’’ यानंतर समर्थांनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घालून ते म्हणाले, ‘‘आजपासून माझे राज्य आहे, मी चालवणार; पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्हाला संचालन करायचे आहे.’’

संपादकीय भूमिका

  • पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी सांगितलेल्या कथेतून समर्थ रामदासस्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानल्याचे सिद्ध होत असल्यानेच मिटकरी यांना जातीद्वेषाचा पोटशूळ उठला आहे. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते राष्ट्राचे महापुरुष आहेत. त्यामुळेच पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी सांगितलेल्या कथेचा मतितार्थ समजून घेणे अपेक्षित आहे !
  • मिटकरी यांनी केवळ पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचाच नव्हे, तर सत्य इतिहास नाकारून छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचाही अवमान केला आहे. त्यासाठी त्यांच्याच विरोधात कुणाला तक्रार करावीशी वाटली, तर चूक ते काय ?