‘जनआक्रोश पदयात्रे’मुळे झालेल्या वाहतूक कोंडीवर संतापलेल्या महिलेवर गुन्हा नोंद !

मुंबई – येथे २१ एप्रिल या दिवशी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने मुंबईमध्ये जनआक्रोश महिला पदयात्रा काढली. या वेळी झालेल्या वाहतूककोंडीमुळे त्रस्त होऊन एका महिलेने मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस यांच्याशी वाद घातला होता. या महिलेच्या विरोधात अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी केलेल्या तक्रारीवरून वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

झेन सदावर्ते यांनी केलेल्या तक्रारीमध्ये या महिलेने मोर्चेकर्‍यांना अवमानकारक शब्द वापरल्याचे नमूद केले आहे. ही महिला चारचाकी गाडी घेऊन तिच्या मुलाला आणण्यासाठी शाळेत जात होती; मात्र अन्य प्रवाशांप्रमाणे ती महिलाही १ घंटा वाहतूककोंडीत अडकली. या वेळी प्रक्षुब्ध झालेल्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना अर्वाच्च भाषेत ‘तुमचे हे काय चालले आहेत. तुम्ही येथून चालते व्हा आणि रस्ता खाली करा’, असे म्हटले. या महिलेने पोलिसांशीही वाद घातला. सामाजिक माध्यमांवर मात्र अनेकांनी राजकीय मोर्च्यांमुळे होणारी वाहतूककोंडी आणि वाहतूक पोलिसांची निष्क्रीयता यांविषयी टीका केली आहे. या प्रकरणी अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी वाहतूक व्यवस्था राखण्यास असमर्थ ठरलेल्या पोलिसांवर मात्र कारवाई झालेली नाही.