मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्य निर्मिती आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पहिले महिला शासकीय अधिकार्‍यांचे मराठी साहित्य संमेलन

‘महिला शासकीय अधिकार्‍यांचे मराठी साहित्य संमेलन’प्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अन्य 

नवी देहली – साहित्य मानवी व्यक्तीमत्त्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. साहित्य मनाची तरलता जिवंत ठेवते. त्यामुळे श्री चक्रधरस्वामी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा वारसा असणार्‍या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड चालू ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महिला शासकीय अधिकार्‍यांच्या पहिल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन, नवी देहली यांच्या सहकार्याने या २ दिवसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.

नवी देहली येथील महाराष्ट्र सदनात हे संमेलन विविध दालनात होत असून मुख्य समारंभ स्थळाला ‘छत्रपती महाराणी ताराराणी दालन’, असे नाव देण्यात आले आहे. ताराराणी यांच्या जयंतीचे हे ३५१ वे वर्ष आहे. या उद्घाटन सोहळ्याला मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांसह अन्य उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेसाठी ७५ मंच सिद्ध करणार आहोत ! 

‘महिला शासकीय अधिकार्‍यांचे मराठी साहित्य संमेलन’प्रसंगी  बोलतांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे मराठीभाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व मराठी भाषेतील संकेतस्थळ अद्ययावत् रहाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठी भाषा इंटरनेटवर (मायाजाळावर) अधिक प्रभावी होईल, तसेच संस्कृत भाषेची अधिक जाहिरात करण्यात येईल, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेसाठी ७५ मंच सिद्ध करणार आहोत. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या साहित्याला पुरस्कार देण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेईल. लवकरच वारकरी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले.