(म्हणे) ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच !’ – Sachin Sawant

  • काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांचे संतापजनक विधान

  • वारकरी संप्रदायात फूट पाडण्याचे विधान करणारे शरद पवार यांचे काँग्रेसकडून समर्थन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (डावीकडे), स्वातंत्र्यवीर सावरकर (वर्तुळात) व काँग्रेसचे नेते सचिन सावंत (उजवीकडे)

मुंबई – वारकरी संप्रदायात ‘प्रतिगामी’ विचारांच्या लोकांनी शिरकाव केला आहे, असे विधान करून हिंदु समाजात फूट पाडणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचे काँग्रेसने समर्थन केले आहे. ‘हिंदु धर्मात नास्तिकता मान्य आहे, तसेच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते’, अशी गरळ ओकून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हिंदुत्वाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक माध्यमांवर त्यांनी हे मत मांडले. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञानाधिष्ठित हिंदुत्वाचा पुरस्कार केला; परंतु त्यांनी हिंदु धर्माचा कधीही त्याग केला नाही. काँग्रेसने केवळ राजकारणासाठी त्यांना ‘नास्तिक’ ठरवून हिंदूंच्या श्रद्धांशी खेळ चालवला आहे ! – संपादक)

सचिन सावंत म्हणाले की, शरद पवारांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचारांच्या भोंदू बाबा, तथाकथित स्वयंघोषित आचार्य आणि विद्वेषपूर्ण विचारधारा पसरवणार्‍या कीर्तनकारांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (शरद पवारांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांची सूची बनवण्याचे वक्तव्य करणे आणि काँग्रेसने त्याचे समर्थन करणे, हा वारकरी चळवळीत फूट पाडण्याचाच प्रयत्न आहे. संतांच्या अभंगांतून समाजप्रबोधन करणार्‍या कीर्तनकारांना ‘भोंदू’ किंवा ‘घुसखोर’ म्हणणे, हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अवमान आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसचा हा प्रयत्न म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच आहे. स्वतःला ‘नास्तिक’ म्हणवून घेणारे किंवा हिंदु धर्माचा सोयीनुसार वापर करणारे लोक जेव्हा सावरकर यांच्या विचारांचा आधार घेतात, तेव्हा त्यामागील हेतू हिंदु मतांचे ध्रुवीकरण रोखणे, हाच असतो. सावरकर यांना ‘नास्तिक’ ठरवण्यापेक्षा काँग्रेसने सावरकर यांचे ‘अखंड हिंदुस्थान’ आणि ‘जातीभेद निर्मूलन’ हे विचार मान्य करण्याचे धाडस दाखवावे !
  • हिंदु धर्माने ‘चार्वाक’ दर्शनासारख्या नास्तिक विचारांनाही स्थान दिले आहे, हे खरे असले, तरी तो उदारमतवाद ‘अधर्म’ पसरवण्यासाठी नाही. ज्या काँग्रेसने न्यायालयात ‘श्रीराम’ हे काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले, ज्यांनी ‘हिंदु आतंकवादा’चे थोतांड जन्माला घातले, त्यांनी हिंदु धर्मातील नास्तिकतेचे दाखले देणे हास्यास्पद आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांना वारकरी संप्रदायातील भक्तीचा मार्ग ‘धर्मांध’ वाटतो, तेव्हा काँग्रेसला संप्रदायाची समता आठवते; पण जेव्हा हिंदुत्वावर आघात होतात, तेव्हा हीच मंडळी गप्प बसतात !