ऊर्जा सुरक्षेसाठी प्रत्येक भारतियांनी योगदान द्यावे ! – ब्रिगेडियर महाजन (निवृत्त)

भारताकडे ६५ दिवसांचा ऊर्जासाठा !

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

पुणे – आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ऊर्जा सुरक्षेच्या लढ्यात प्रत्येक भारतियाने सजग राहून योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ब्रिगेडियर महाजन एरंडवणे परिसरातील सेवा भवन येथे आयोजित ‘भारत आणि मध्यपूर्व संघर्ष’ या विशेष व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाचे आयोजन ‘व्ही.एस्.के. पुणे फाऊंडेशन’ आणि ‘प्रज्ञा प्रवाह’ यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी तेल आणि वायू क्षेत्रांतील जागतिकतज्ञ कल्याण कुलकर्णी, ‘प्रबोधन मंचा’चे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी आणि ‘विश्व संवाद केंद्रा’चे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी पुढे सांगितले की, जगाच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित स्थितीत आहे. सध्या देशाला बाह्य संकटांपेक्षा अंतर्गत दुष्प्रचार आणि अपप्रचार यांचा धोका अधिक आहे. नागरिकांनी ‘देश प्रथम’ ही भावना ठेवून अपप्रचाराला बळी पडू नये.

या वेळी तेल आणि वायू क्षेत्रांतील जागतिकतज्ञ कल्याण कुलकर्णी यांनी इराणच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. इराणचा इतिहास लढाऊ वृत्तीचा असून झोराष्ट्रीयन धर्म सनातन धर्मातून प्रभावित होता. इस्लामसमवेतच्या लढाईतही त्यांनी सहजासहजी शरणागती पत्करली नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले.