‘मराठा तितुका मेळवावा’च्या पुढाकाराने वल्लभगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विराजमान !

दक्षिण दिग्विजय मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्याविषयी सोहळा !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला नमन करतांना श्री. योगेश केरकर

बेळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्याविषयी कोल्हापूर येथील ‘मराठा तितुका मेळवावा’ या संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील हरगापूर येथील वल्लभगडावर श्री दिग्विजय हा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ५ फुटी मूर्ती स्थापित करण्यात आली. ही मूर्ती आता कायमस्वरूपी वल्लभगडावरच असणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या होमाप्रसंगी श्री. योगेश केरकर, तसेच अन्य

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यानंतर कोल्हापुरातील १४ दुर्गांच्या स्थळांवरून नेलेल्या जलाने मूर्तीला जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेले भगवे वस्त्र अन् कवड्यांची माळ मूर्तीला अर्पण करण्यात आली. या प्रसंगी सर्वश्री ऋषिकेश देसाई, प्रवीण जाधव, अरविंद निंबाळकर, विनायक मांडरेकर, राहुल शिंदे, प्रवीण जाधव यांसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

मूर्ती पूजनानंतर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. रणजित घरपरणकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी वर्ष १६७६ ते १६७८ या कलावधीत दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते करून त्यांच्यातील मुत्सद्दीपणा जगाला दाखवून दिला. स्वराज्य विस्ताराची मोहीम म्हणून याकडे पाहिले जाते. या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी विस्तीर्ण भूभाग जिंकून स्वराज्यला अभेद्य अशी दक्षिणेची राजधानी मिळवून दिली.’’ प्रतिष्ठानचे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृती कायमस्वरूपी लोकांच्या डोळ्यांसमोर रहावी या उद्देशाने आम्ही ही मूर्ती स्थापित केली आहे. महाराष्ट्रातून जाऊन सर्व पूर्तता करून अत्यंत कठीण असे एकमेव कार्य प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही पार पाडले.’’