देवगड तालुक्यातील दहिबाव येथे गंगा अवतरली !

गोमुखातून वहाणारी गंगा

देवगड – तालुक्यातील दहिबाव येथे गंगाक्षेत्रावरील कुंडात १ एप्रिलपासून गंगा अवतरली आहे. गंगा येण्यापूर्वी कुंडातील पाणी दूधाळ होते. सध्या हे गंगाकुंड पाण्याने तुडूंब भरून वहात आहे. कुंडाच्या गोमुखातून पाण्याचा जोरदार प्रवाह चालू आहे. गंगा अवतरल्याचे समजताच भाविक गंगाक्षेत्रावर गर्दी करून लागले आहेत. अनेक भाविकांनी तेथे स्नानाची पर्वणी साधली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे गंगा अवतरल्यानंतर ८ दिवसांनी दहिबाव येथील गंगाक्षेत्रात गंगा अवतरली आहे.

यापूर्वी प्रत्येक ३ वर्षांनी नियमित येणार्‍या गंगेचे आगमन आणि गमन या कालखंडात पालट  झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. गंगामाईचे आगमन आणि गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखित झाले आहे. गंगाक्षेत्रानजीकच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.