RBI Payment Rule : १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ऑनलाईन व्यवहार करण्यास १ घंट्याचा विलंब होणार !

  • डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चा प्रस्तावावर अभ्यास चालू

  • ८ मेपर्यंत सूचना मागवल्या; त्यानंतर कार्यवाहीच शक्यता !

मुंबई – १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ऑनलाईन व्यवहार त्वरित होणार नाहीत. त्यात १ घंट्याचा विलंब होऊ शकतो. यामुळे ग्राहकांना चुकीचे व्यवहार थांबवण्याची किंवा रहित करण्याची संधी मिळू शकते. देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने हा प्रस्ताव ठेवला आहे. यावर चर्चा करून पुढील काही महिन्यांत यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात. टप्प्याटप्प्याने त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

१. फसवणूक करणारे अनेकदा मानसिक दबाव आणून घाईघाईने पैसे हस्तांतरित करतात. या प्रकारामुळे हा विलंब न्यून करता येईल. वापरकर्त्याला विचार करण्याची किंवा चूक सुधारण्याची संधी मिळेल.

२. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी सुरक्षा अधिक कडक केली जाईल. ५० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्यवहारांसाठी एका विश्वसनीय व्यक्तीची अनुमती आवश्यक असेल.

३. एखाद्या व्यक्तीला किंवा व्यापार्‍याला पैसे पाठवले आणि जर आपण त्याला ओळखत असू, तर त्याला तुमच्या ‘व्हाईटलिस्ट’मध्ये (अनुमती असलेल्या सूचीत) समाविष्ट करू शकता. या सूचीतील लोकांना पैसे पाठवतांना १ घंट्याचा विलंब होणार नाही. त्यामुळे नियमितच्या व्यवहारांमध्ये अडचण येणार नाही.

४. बँकेने ‘किल स्विच’ची शिफारस केली आहे. यामध्ये जर एखाद्या ग्राहकाला वाटले की, त्याचे खाते हॅक झाले आहे किंवा कोणताही चुकीचा व्यवहार होत आहे, तर तो एका ‘क्लिक’वर त्याच्या सर्व डिजिटल पेमेंट सेवा त्वरित बंद करू शकेल.

वर्ष २०२५ मध्ये देशात डिजिटल फसवणुकीमुळे २२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक हानी झाली होती. बँकेने याविषयी ८ मेपर्यंत जनता आणि भागधारक यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल.