कोल्हापूर येथील राजाराम बंधार्‍याजवळ ५० टनांहून अधिक कचरा जमा !

राजाराम बंधार्‍याजवळ मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा

कोल्हापूर – शहर आणि परिसरात जयंती नदीसह शहरातील विविध नाल्यांमधून वाहून आलेला ५० टनांहून अधिक कचरा राजाराम बंधार्‍यात अडकला आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरात झालेल्या अवेळी पावसाने नाले दुथडी भरून वाहू लागले आणि त्याच समवेत असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, थर्माकोल, टायर, गाद्या, तसेच अन्य वस्तू असा कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आला आहे. या कचर्‍याचा २ फुटांपेक्षा अधिक थर राजाराम बंधार्‍याजवळ साचला आहे. या कचर्‍यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काळपट झाले असून त्याला दुर्गंध येत आहे.

प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी काय करत आहेत ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

संपादकीय भूमिका

प्रत्येक वेळी गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणून कांगावा करणारे साम्यवादी-पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आता कुठे आहेत ?