‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ पुन्हा दादर स्थानकापर्यंत करावी !

खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी !

मुंबई – कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या पसंतीची ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ पुन:श्च दादर स्थानकातून चालू करण्यात यावी, तसेच शक्य असल्यास ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस्.एम.टी.) पर्यंत विस्तारित करून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा विचार करावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. यापूर्वी १० जानेवारी २०२५ या दिवशी रवींद्र वायकर यांनी अश्विनी वैष्णव यांना यासाठी निवेदन दिले होते; परंतु त्यानंतरही रेल्वे विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

याविषयी पुन्हा दिलेल्या निवेदनात खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे की, 

१. मुंबईहून कोकणात जाणारे लाखो सामान्य नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ ही दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. मागील २५ ते ३० वर्षांपासून ही गाडी नियमितपणे दादर स्थानकापर्यंत धावत होती; परंतु कोरोनाच्या काळात ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही गाडी दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.

२. दिवा स्थानकापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो. ज्यामुळे वेळ, व्यय आणि शारीरिक त्रास वाढतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्रीच्या वेळेत प्रवास करणार्‍यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरते.

३. रस्त्याने प्रवास करायचा झाल्यास मुंबई–गोवा महामार्गाची स्थिती अनेक ठिकाणी अत्यंत खराब आहे. ज्यामुळे प्रवास कठीण आणि धोकादायक होतो. अशा परिस्थितीत ही पॅसेंजर कोकणातील सामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूकव्यवस्था होती.

४. रेल्वे प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष वाढत आहे. हा केवळ रेल्वेचे सूत्र नसून कोकणातील जनतेच्या भावना आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय आहे. ही रेल्वे दादर येथून सुटल्यास, तसेच दादरपर्यंत आल्यास लाखो सामान्य प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल.