गुन्हेगारांना पोलिसांच्या गणवेशाची भीती वाटली पाहिजे ! – UP CM Yogi Adityanath

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सणांच्या काळात कोणत्याही प्रकारचा उपद्रव अजिबात सहन केला जाणार नाही. वातावरण बिघडवणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांना पोलिसांच्या गणवेशाची भीती वाटायला हवी. सण-उत्सव परंपरेच्या चौकटीतच साजरे केले जावेत, कोणत्याही नवीन परंपरेला अनुमती दिली जाणार नाही, अशी चेतावणी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर दिली. ते कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. या ऑनलाईन बैठकीमध्ये पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,

प्रत्येक तक्रार आणि प्रत्येक घटना यांना गांभीर्याने घ्या !

कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित केली जावी. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही. गुन्हेगारीची एकही घटना संपूर्ण समाजाचे वातावरण बिघडवते; म्हणून प्रत्येक तक्रार आणि प्रत्येक घटना यांना गांभीर्याने घेतले जावे.

भोंग्यांचा आवाज निर्धारित मानकांमध्ये असावा !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत सांगितले की, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज निर्धारित मानकांमध्येच ठेवला जावा. नियम मोडल्यास भोंगे हटवण्याची कठोर कारवाई करावी. मोटारसायकलवरील स्टंटबाजी (जीवघेणे खेळ) तात्काळ थांबवण्यात यावी.

चैत्र नवरात्रीत मंदिरांमध्ये दक्षता घ्यावी !

चैत्र नवरात्रीत देवींच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता, सुरक्षा, स्वच्छता, गर्दी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, प्रकाश आणि आरोग्य सेवा आदींची पूर्ण व्यवस्था करावी. प्रमुख मंदिरे आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त दक्षता घ्यावी.

गोआश्रय स्थळांमधील व्यवस्था अधिक चांगल्या कराव्यात !

मुख्यमंत्र्यांनी निराधार गो-आश्रय स्थळांमधील व्यवस्था अधिक चांगल्या करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नोडल (विविध विभागांशी समन्वय करणार्‍या) अधिकार्‍यांची नियुक्ती, वेळेवर निधीचे वाटप, गोवंशाचे संरक्षण, चारा आणि इतर आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्यास सांगितले.

एल्.पी.जी. सिलिंडरच्या काळाबाजारवर कडक लक्ष ठेवा !

एल्.पी.जी. सिलिंडरांच्या पुरवठ्याच्या संदर्भात सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. साठेबाजी आणि काळाबाजार यांवर कडक लक्ष ठेवावे. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि लोकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे.