गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभरात दक्षता पथकांकडून धाडी

१ सहस्र २०८ सिलिंडर जप्त ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला संभाव्य इंधन तुटवडा आणि घरगुती गॅसचा होणारा काळाबाजार रोखून राज्यात गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काळाबाजार करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘दक्षता पथके’ स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी १७ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. विधान परिषद नियम ९३ अन्वये उपस्थित सूचनेवर निवेदन करतांना ते बोलत होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की,

१. जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत राज्यात २ सहस्र १२९  ठिकाणी पडताळण्या करण्यात आल्या. या कारवाईत १ सहस्र २०८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून २३ गुन्हे नोंद करून १८ जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत ३३ लाख ६६ सहस्र रुपयांहून अधिक आहे.

२. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना फिरती पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच तक्रारींसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

३. केंद्रशासनाने ७ मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ केली असून आता १ सिलिंडर ९१२.५० रुपयांना मिळणार आहे, तर व्यावसायिक सिलिंडर १ सहस्र ८३५ रुपये करण्यात आले आहे.

४. एल्.पी.जी.ला पर्याय म्हणून केरोसिन (घासलेट) वितरणाचा पर्यायही शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ सिलिंडर विनामूल्य देण्याची प्रक्रिया चालू आहे.

५. युद्धाच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी ते ११ मार्च या काळात शेंगदाणा तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत प्रतिकिलो ६ ते ७ रुपयांची वाढ झाली आहे.