Pansare Murder Case : भारतात ‘समान नागरी कायदा’ होण्यासाठी आम्ही कधीही आंदोलन केले नाही ! – शशिकांत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर, १६ मार्च (वार्ता.) – कामगारांची संघटना असलेली ‘आयटक’, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ यांनी कधीही भारतात ‘समान नागरी कायदा’ होण्यासाठी आंदोलन केले नाही. आमच्या बैठकांमध्ये कधीही समान नागरी कायदा होण्याच्या संदर्भात चर्चा झाली नाही, असे उत्तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे साक्षीदार शशिकांत पाटील यांनी दिले.

अधिवक्ता सोमनाथ भरमगुंडे हे पाटील यांची उलटपडताळणी घेत असून त्या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना पाटील यांनी वरील उत्तर दिले. कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे.

या वेळी बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता नागेश जोशी, तर सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल या दिवशी होणार आहे.