महाराष्ट्रात ६ वर्षांत ३० लाखांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांचा चावा !

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन

  • वर्षभरात मुंबईत १ लाख २८ सहस्र नागरिकांना कुत्रे चावले

  • प्रतिदिन सरासरी १ सहस्र ३६९ लोकांना कुत्रे चावतात

श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, मुंबई.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली असून सामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मागील ६ वर्षांत राज्यात ३० लाखांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यातच वर्ष २०२४ मध्ये केवळ मुंबईत १ लाख २८ सहस्र नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. राज्यात प्रतिदिन सरासरी १ सहस्र ३६९ नागरिक कुत्र्यांच्या आक्रमणात मृत्यूमुखी ठरत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत नगरविकास विभागाने तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

राज्यातील विशेषतः मुंबई आणि नागपूर शहरांतील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याविषयी विधान परिषदेत सदस्य कृपाल तुमाने, डॉ. (श्रीमती) मनीषा कायंदे, हेमंत पाटील, योगेश टिळेकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अधिवक्ता निरंजन डावखरे, डॉ. परिणय फुके, विक्रांत पाटील, सदाशिव खोत आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथे २७ सहस्र ४६६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. दिवा (जिल्हा ठाणे) येथील ६ वर्षीय कु. निशा शिंदे हिचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजच्या संसर्गाने दुर्दैवी मृत्यू झाला होता.

प्रशासनाकडून उपाययोजना !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले आणि रेल्वे स्थानके यांसारख्या संवेदनशील ठिकाणांजवळ भटक्या कुत्र्यांसाठी निवारे (शेल्टर) उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी ३ जागा निश्चित केल्या असून अन्य १७ जागांचा शोध घेतला जात आहे. कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी नसबंदी मोहिमेला गती देण्यात येत आहे. रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासू नये, यासाठी आवश्यक दक्षता घेतली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • राज्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस !
  • प्रशासनाने उपाययोजनांचे आश्वासन देण्यासह भटक्या आणि आक्रमक कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस कृती आराखडा राबवून नागरिकांना सुरक्षित वातावरणात जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी !