रत्नागिरी शहरात ५७ पैकी केवळ ७-८ सीसीटीव्ही कॅमेरे चालू

एजन्सीवर गुन्हा नोंदवला

रत्नागिरी – शहराच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी बसवण्यात आलेल्या ५७ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी सद्य:स्थितीत केवळ ७ ते ८ कॅमेरे चालू आहेत, तर उर्वरित सर्व कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर नोंद घेत संबंधित दुरुस्ती एजन्सीवर गुन्हा नोंदवला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याने नागरिकांमध्येही अप्रसन्नता आहे. आता पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे सीसीटीव्ही कॅमेरे लवकर दुरुस्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, संबंधित दुरुस्ती एजन्सीला वारंवार सूचना देऊनही त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

२. सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने आणि एजन्सीने कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

३. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

४. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आणि रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची आहे. ती बंद असल्याने शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

जनतेच्या सुरक्षेविषयी अशा प्रकारे निष्काळजी असणार्‍या एजन्सीवर कठोर कारवाई करणे आवश्यक !