स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या ! – Prasad Lad

  • भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी !

  • प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

स्वातंत्र्यवीर सावरकर

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा. राज्य सरकारच्या संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. प्रसाद लाड यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत केली.

या मागणीवर संसदीय कार्यमंत्री श्री. चंद्रकांत पाटील सकारात्मक प्रतिसाद देत म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत हा प्रस्ताव मांडतो. त्यानंतर सभापती महोदयांनी त्यावर निर्णय घ्यावा.’’

हिंदुत्वनिष्ठ सरकारकडून जनतेला अपेक्षा !

गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहेेे; मात्र तरीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटना खंत व्यक्त करत आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ पदवीसाठी नव्हे, तर या देशाच्या अस्मितेसाठी जगले. त्यांना ‘भारतरत्न’ मिळणे हा सावरकर यांचा नव्हे, तर त्या पुरस्काराचाच खर्‍या अर्थाने सन्मान ठरेल. राज्य सरकारने केवळ आश्‍वासन न देता प्रत्यक्ष कृती करून ठराव लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवावा, हीच देशप्रेमी नागरिकांची इच्छा आहे !