Justice Swaminathan :  जे गुरूंना मानत नाहीत, ते मूर्ख !

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांचे विधान

न्यायमूर्ती स्वामीनाथन्

होसुर (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये काही जण स्वतःला तर्कवादी म्हणवतात. आम्ही गुरूंना देवस्वरूप मानतो म्हणून हे लोक आम्हाला बदमाश, मूर्ख आणि रानटी म्हणतात. जे असे म्हणतात तेच बदमाश, मूर्ख आणि रानटी आहेत. हे सूत्र तर्कशुद्ध पडताळणीचे नसून गुरूंवर श्रद्धा ठेवणार्‍यांची थट्टा करण्याचे आहे, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् यांनी येथे ‘गुरु वंदना उत्सव’मध्ये बोलतांना बुद्धीप्रामाण्यावाद्यांना फटकारले.

न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांनी गुरुपूजेच्या तात्त्विक आधाराचे स्पष्टीकरण देतांना म्हटले की, देव प्रत्यक्ष दिसत नसला, तरी गुरु हे सजीव आध्यात्मिक रूप असतात. मठांमध्ये अनेक गुरु असू शकतात; मात्र त्यांची तत्त्वज्ञानपर भूमिका एकसारखी असते.

भारतीय परंपरेत गुरूंना केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर ज्ञान, शिस्त आणि नैतिक मूल्य यांचे संस्कार करणारे माध्यम म्हणून पाहिले जाते.

वैयक्तिक अनुभूतीतून श्रद्धेला बळ

एक वैयक्तिक प्रसंग सांगतांना न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांनी नमूद केले की, चंडीगड ते देहली या प्रवासाच्या वेळी दाट धुक्यात चारचाकी बंद पडली. दृश्यमानता अत्यंत अल्प होती. त्या वेळी मी गुरूंचे स्मरण केले आणि पूजा केली. सुदैवाने कोणतीही अनिष्ट घटना घडली नाही. कठीण प्रसंगी श्रद्धेमुळे मानसिक बळ मिळते.

गुरूंच्या आधारे पुढील सेवा करीन !

न्यायमूर्ती स्वामीनाथन् म्हणाले की, माझ्या सेवेचा ४ वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. या काळात धैर्य मिळण्यासाठी मी गुरूंचा आधार घेईन, असे त्यांनी नमूद केले.

कोण आहेत न्यायमूर्ती स्वामीनाथन् ?

न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांनी अलीकडेच तमिळनाडूतील तिरुपरनकुंद्रम् येथील एका दर्ग्याजवळ असलेल्या दीपस्तंभावर पारंपरिक दिवा लावण्याचा निर्देश हिंदूंना दिला होता. राज्य सरकारने या आदेशाला आक्षेप घेतला आणि १०० हून अधिक खासदारांनी भेदभाव अन् धर्मनिरपेक्ष तत्त्वांपासून दूर गेल्याचा आरोप करत महाभियोगाचा प्रस्ताव मांडला. प्रखर हिंदुत्वनिष्ठांच्या मते न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय योग्य आणि परंपरेला धरून होता.