प्राचीन मठ, मंदिरे आणि घरे यांचे पाडकाम म्हणजे सार्वजनिक पैशांचा अपव्यय ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, ज्येष्ठ नेते, भाजप

पंढरपूर ‘कॉरिडॉर’ला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र !

मुंबई – पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. येथील मातीला स्पर्श करणे हेही पुण्याचे कर्म मानले जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्री वाराणसी किंवा उज्जैन यांच्या धर्तीवर ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) लादणे अयोग्य आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी प्रस्तावित ‘पंढरपूर कॉरिडॉर’ला विरोध दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची आणि वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्याची विनंती केली आहे.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पत्रात उपस्थित केलेली महत्त्वपूर्ण सूत्रे अशी…

१. पंढरपूरमध्ये गेल्या अनेक शतकांपासून ‘यजमान कृत्य’ (भाविकांना घरात आश्रय देणे) ही परंपरा चालत आली आहे. ७०० हून अधिक मालमत्ता, प्राचीन मठ आणि मंदिरे पाडून कॉरिडॉर उभारणे, हा वारकर्‍यांच्या भावनांशी खेळ आहे.

२. यात्रेकरूंसाठी राखीव असलेल्या ६५ एकरसारख्या अनेक भूखंडांवर आज झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवण्याऐवजी सरकार जुने पंढरपूर उद्ध्वस्त करायला निघाले आहे. हा सार्वजनिक पैशांचा अपवापर आहे.

३. वर्ष २०१४ आणि २०२५ च्या विकास आराखड्यात या कॉरिडॉरचा कोणताही उल्लेख नाही. केवळ वाराणसीच्या धर्तीवर व्यापारी संकुल आणि मनोरंजन केंद्र उभारणे, हे तीर्थक्षेत्राच्या पावित्र्याला बाधा आणणारे आहे.

४. चंद्रभागेच्या पलीकडील तीरावरील भूमीचा वापर करून किंवा सध्याच्या सुविधांची योग्य देखभाल करून भाविकांना सोयी देता येतील. त्यासाठी मंदिराजवळील प्राचीन वास्तू पाडण्याची आवश्यकता नाही.

५. डॉ. स्वामी यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, सरकारने भजन-कीर्तनाचे मंडप पाडून नवीन सभागृह बांधण्याचा प्रस्ताव ठेवणे हास्यास्पद आहे. जेथे भक्तीचा वास आहे, ती ठिकाणे पाडून नवीन बांधकामे करणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचे आहे.

संपादकीय भूमिका

  • तीर्थक्षेत्रांचा विकास हा तेथील मूळ आध्यात्मिक चैतन्य आणि ऐतिहासिक वारसा जपूनच व्हायला हवा.
  • वारकरी, स्थानिक नागरिक आणि संत यांच्या मठांना धक्का न लावता पंढरीचा विकास साधणे, हेच सरकारी यंत्रणांचे कर्तव्य आहे !