पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा आणि शिवसेनेला चांगल्या जागा !

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक

 

कोल्हापूर – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून बहुतांश ठिकाणी महायुती सत्तेत आली आहे. शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या आहेत.

सांगली – जिल्ह्यात भाजपला १८, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी ७, काँग्रेसला ११, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १५ जागा मिळाल्या आहेत. येथे जनसुराज्य शक्तीला १, तर रयत क्रांतीला १ जागा मिळाली आहे. येथे महायुतीच्या एकूण ३४ जागा असून त्यांची सत्ता येणार, हे निश्चित आहे.

कोल्हापूर – येथे महायुतीची सत्ता आली असून एकूण ६८ जागांपैकी सर्वाधिक २० जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजप १२, शिवसेना ९, काँग्रेस १४, ठाकरे पक्षाला १, जनसुराज्य शक्ती पक्षाला ५, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १, तर शाहू आघाडीला ४ जागा, तर २ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.

लातूर – येथे ५९ जागांपैकी सर्वाधिक २३ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजप १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, शिवसेना १, उद्धव बाळासाहेब ठाकरे १, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.

बार्शीमध्ये पंचायत समितीच्या १२ आणि जिल्हा परिषदेच्या ६ अशा १८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीला एकही जागा मिळालेली नाही.

पुणे – शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला नवले यांचे सामाजिक माध्यमांवर ५ लाखांपेक्षा अधिक ‘फॉलोअर’ (पाठीराखे) आहेत. त्यांचा भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी २ सहस्र ७०० मतांनी पराभव केला आहे. निर्मला नवले या संगणक अभियंता असून बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाल्यावर उच्चशिक्षित सरपंच म्हणून त्यांचा गौरव केला गेला होता.