कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झर्‍याप्रमाणे ! – प्रा. दिनेश रसाळ यांचे गौरवोद्गार

रत्नागिरी – कोकण निसर्गाने जेवढे समृद्ध आहे, तेवढेच बुद्धीमत्तेने संपन्न, समृद्ध आहे. कोकणात अनेक संस्कृत विद्वान होऊन गेले. ज्यांनी भरीव कार्य केले. कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झर्‍याप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील प्रा. दिनेश रसाळ यांनी काढले.

ते सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या वतीने आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

प्रास्ताविकात संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी चर्चासत्राचा उद्देश आणि कोकणातील विद्वान परंपरा यावर भाष्य केले. या वेळी प्रा. दिनेश रसाळ म्हणाले की, कोकणात विद्वानांची दीर्घ परंपरा आहे. भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, वामन शिवराम आपटे, लोकमान्य टिळक, पी.के. गोडे, वरदानंद भारती, प.प. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी महाराज यांसारख्या विभूती होऊन गेल्या. कोकणाच्या भूमीत जन्मलेल्या विद्वानांनी व्याकरण, वेदांत, तत्त्वज्ञान यासारख्या अनेक विषयांवर चतुरस्त्र, भरीव काम केले आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

देववाणी संस्कृतचे अद्वितीयत्व !

ब्रिटीशांकडून बापूदेवशास्त्रींना महामहोपाध्याय पदवी

कोकणात जन्मलेले नृसिंह सीताराम परांजपे ज्यांना बापूदेव शास्त्री या नावानेसुद्धा ओळखले जाते. व्हिक्टोरिया राणीचा सुवर्णमहोत्सव जेव्हा साजरा केला जात होता. तेव्हा बापूदेव शास्त्री यांचा कार्यकर्तृत्वाचा आवाका पाहून तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी दिली. त्यामुळे भारतातील पहिले महामहोपाध्याय म्हणून बापूदेव शास्त्री यांची विशेष ख्याती आहे. जी कोकणासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे म्हणाले की, धर्मशास्त्राला वेगवेगळे आयाम देण्याचे कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. बापूशास्त्री छत्रे यांनी प्रथम संस्कृत भाषेतील कथा मराठीत आणल्या. कोकणातील जनुभाऊ निमकर यांनी काशीला जाऊन कालिदास लिखित शाकुंतल संस्कृतमधून सादर केले होते. त्यामुळे कोकणात असलेली परंपरा पहाता संस्कृतशिवाय आपल्या वाणीला आणि देशाला मार्ग नाही.