(म्हणे) ‘आत्मघाती आक्रमणकर्त्यांची संख्या सांगितली, तर खळबळ उडेल !’-Masood Azhar

जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा ध्वनीसंदेश

मसूद अझहरचा दावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा एक ध्वनीसंदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे; मात्र ‘हा संदेश नेमका कधी आणि केव्हा प्रसारित झाला ?’, याची निश्चिती झालेली नाही. या संदेशात मसूद अझहर त्याच्या संघटनेकडे सहस्रोंच्या संख्येने आत्मघाती आक्रमणकर्ते असल्याचा दावा करत आहे. मसूद अझहर याच्या मते हे आतंकवादी कधीही आक्रमणासाठी सिद्ध असतात. हे लोक १-२ किंवा १०० नाहीत, सहस्रही नाहीत आणि संपूर्ण संख्या सांगितली, तर जगभरातील माध्यमांत खळबळ उडेल. आमचे लोक कोणतीही भौतिक मागणी करत नाहीत. त्यांना वाहन, पैसा, मुलांचे शिक्षण, कर्जफेड, दूरचित्रवाणी किंवा युरोप, अमेरिका यांचा व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का.) यांपैकी काहीही नको. त्यांना केवळ हौतात्म्य हवे आहे.

भीतीपोटी मसूद देत आहे संदेश ! – संरक्षणतज्ञ

संरक्षणतज्ञांच्या मते हा संदेश मसूद अझहरची भीती दर्शवणारा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत झालेल्या कारवाईत जैश-ए-महंमदची अनेक ठिकाणे नष्ट झाली होती. या कारवाईत मसूद अझहरच्या कुटुंबातील सुमारे १० जण मारले गेल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. बहावलपूरमधील त्याच्या ठिकाणावर जोरदार स्फोट झाला होता आणि तो थोडक्यात बचावला होता. त्यानंतर तो सार्वजनिक जीवनातून गायब झाल्याचे सांगितले जाते. तो एखाद्या गुप्त ठिकाणी राहून असे ध्वनीसंदेश प्रसारित करत असतो. यामागचा उद्देश भीती पसरवणे, समर्थकांचे मनोबल वाढवणे आणि स्वतःची दुर्बल स्थिती लपवणे हाच असल्याचे मानले जाते. भारतीय सुरक्षायंत्रणा अशा विधानांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही संभाव्य धोक्याला सामोरे जाण्यासाठी सतर्क आहेत.

संपादकीय भूमिका

मसूद याच्याकडे आता आतंकवादी शिल्लक राहिलेले नाहीत, असेच या विधानातून लक्षात येते !