अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी दिलेले अभिप्राय !

प्रस्तावनासातारा येथे नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या वेळी सातारा येथील संमेलनाविषयी युवा विद्यार्थ्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत…

१. कु. सायली जाधव, सातारा – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सातारा येथे होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. त्यामुळे आपल्याला विशेष महत्त्व आहे. मराठी वाचक आणि रसिक यांना संपन्न बनवणार्‍या या साहित्य संमेलनाचे शतक पूर्व साहित्य संमेलन ‘याची देही याची डोळा’ पहायला, अनुभवायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. मराठी भाषा सर्वांची असली, तरी सारस्वतांच्या या ज्ञानमेळ्यात पुरोगामींचा वाढता हस्तक्षेप मनाला वेदना देणारा आहे.

२. कु. योगेश कोळपे, सातारा
आम्ही माण तालुक्यातून आलो आहोत. साहित्य संमेलनामध्ये लावण्यात आलेले पुस्तकांचे प्रदर्शन अवर्णनीय आहे. यामध्ये गोष्टी, कथा कादंबर्‍या, कविता, ज्ञान, विज्ञान, साधना धर्म, अध्ययन सर्वच क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण पुस्तके सवलतीच्या शुल्कात उपलब्ध आहेत. अगदी स्पर्धा परीक्षांसाठीही आवश्यक असलेली सर्व पुस्तके सवलतीच्या शुल्कात उपलब्ध आहेत.

३. कु. अमर मतकरी, सातारा
मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण नवीन नाही. संमेलनाच्या कार्याध्यक्षांवर झालेल्या शाईफेक कृत्यामुळे साहित्य संमेलनाला गालबोट लागले असले, तरी संमेलनावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही; मात्र साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासारख्या लेखकांनी कादंबरीतील आक्षेपार्ह भाग वगळण्याचे मान्य केल्यामुळे विरोधकांना चेव चढला असावा !

मराठी साहित्य संमेलनामध्ये हास्यजत्रासारख्या सुमार दर्जाच्या कार्यक्रमांचे काय काम ? असा प्रश्न आम्हाला पडतो. साहित्यरसिक आणि नाट्यरसिक यांमधील भेद आयोजकांनी समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

४. कु. प्रशांत शिंदे, सातारासाहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रचंड खर्च करण्यात आला आहे. मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे साहित्य संमेलन असले, तरी एवढा खर्च योग्य नव्हे ! त्याचसमवेत मराठी भाषा इतर भाषांचा द्वेष करत नसली, तरी संमेलनातील प्रदर्शनात कुराण आणि बायबल असणे, हे कळत नाही. प्रदर्शनात इंग्रजी पुस्तकांचे मोठे प्रदर्शनही पहायला मिळाले. मराठी वाचकांना एकाच छताखाली हे सर्व उपलब्ध होत असले, तरी यातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन किती प्रमाणात होईल ? याविषयी मला साशंकता आहे.