मराठीचा अवमान केलात, तर मार खाल ! – संदीप देशपांडे, मनसे

  • मुंबईत उत्तर भारतियांविषयी लावलेल्या फलकांच्या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांची चेतावणी !

  • मराठी माणसाचा अवमान सहन केला जाणार नसल्याची भूमिका !

मुंबई – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांत ‘उत्तर भारतीय बटोगे, तो पिटोगे’ (उत्तर भारतियांनो, विभाजित झालात, तर मार खाल) असे लिखाण असलेले फलक लावण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी ‘उत्तर भारतीय विकास सेने’चे सुनील शुक्ला यांना प्रत्युत्तर देत पोस्ट प्रसारित केली. त्यात ते म्हणाले, ‘‘मराठीचा अवमान केलात, तर ‘नही बटोगे, तो भी पिटोगे’ (मराठीचा अवमान केल्यास, जरी तुम्ही विभाजित झाला नाहीत, तरी मार खाल) ‘मराठी माणसाचा अवमान सहन केला जाणार नाही’, हा संदेश देण्यासाठीच मी सामाजिक माध्यमांवर पोस्ट केली आहे.’’

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, हा वाद ‘मराठी विरुद्ध उत्तर भारतीय’ असा नसून जाणीवपूर्वक राजकीय लाभासाठी तो निर्माण केला जात आहे. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा वाद पेटवला जात आहे. मुंबईकरांच्या भावना, भाषा आणि अस्मिता यांचा वापर केवळ मतांसाठी केला जात आहे. मराठी माणूस कुणाच्या विरोधात नाही; पण त्याच्या स्वाभिमानावर आघात झाला, तर उत्तर देणे अपरिहार्य ठरेल.