महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात भरवली जाणार पुस्तकांची जत्रा !

१४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ !

मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांची जत्रा भरवण्यात येणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा विभागाकडून राज्यात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.

यानिमित्त मराठी भाषेविषयी परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे, कवीसंमेलने, एकांकिका, बालनाट्ये, नाटके, पुस्तक प्रकाशन, साहित्य पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, चारोळीलेखन, कवितालेखन, हस्ताक्षर स्पर्धा, शुद्धलेखन, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, अभिवाचन, वादविवाद स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, शब्दकोडी स्पर्धा, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, माहितीपटाचे सादरीकरण, मुलाखती आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश शासनाकडून सर्व शासकीय कार्यालये, तसेच जिल्हा प्रशासन यांना देण्यात आले आहेत. पंधरवड्यानिमित्त सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना भ्रमणभाषवर टंकलेखनासाठी मराठी युनिकोड भाषेचा उपयोग करण्याचे आवाहन मराठी भाषा विभागाकडून करण्यात आले आहे.