वडाळा (मुंबई) येथील कांदळवनातील रोहिंग्या आणि बांगलादेशींचे अतिक्रमण या विरोधात ‘कोंम्बिग ऑपरेशन’ करणार !

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा निर्णय

(कोंम्बिग ऑपरेशन म्हणजे पोलीस किंवा सुरक्षादलांनी विशिष्ट भागातील गुन्हेगार, संशयित व्यक्ती किंवा अवैध गोष्टींचा शोध घेणे.)

गृहराज्यमंत्री योगेश कदम

नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – शांतीनगर, वडाळा (मुंबई) येथील कांदळवनाच्या भूमीवर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचे अतिक्रमणाच्या विरोधात वन विभाग अन् पोलीस विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून १५ आणि १६ डिसेंबर या २ दिवसांमध्ये ‘कोंम्बिग ऑपरेशन’ करून अतिक्रमण काढण्यात येईल, तसेच पुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. भाजपचे प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील लक्षवेधी विधान परिषदेमध्ये उपस्थित केली होती.

गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, ‘‘वर्ष २०१२ मध्ये कांदळवन दक्ष विभागाची स्थापना करण्यात आली. कांदळवनामध्ये १८४ पेक्षा अधिक सुरक्षा बलातील जवानांची सुरक्षा गस्त घालण्यात येत आहे. येत्या ६ महिन्यामध्ये कांदळवनाची ‘गूगल मॅपिंग’ पूर्ण करण्यात येईल. त्यातून अतिक्रमण थांबवण्यास साहाय्य होईल. आतापर्यंत वन विभाग आणि गृह विभाग यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आलेली नाही.’’ एक विषय अतिक्रमणाचा आणि दुसरा अतिक्रमण केलेल्यांनी रोहिंग्या किंवा घुसखोरी बांगलादेशी नागरिकांना झोपडी विकणे हा आहे. यावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. कांदळवनाचे क्षेत्र असलेल्या मुंबई, ठाणे, पालघर या विभागांमध्येही आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री कदम म्हणाले.