‘सी.बी.एस्.ई.’च्या ८ वीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास २२ पानांमध्ये मांडला !

  • विधान परिषद अर्धा तास चर्चासत्र

  • ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा निर्णय

  • १ ली ते इयत्ता १२ वीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकामध्ये छत्रपतींचा इतिहास मांडणार

  •  एन्.सी.ई.आर्.टी.चा हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे मुलांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार !

नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) ‘सी.बी.एस्.ई.’च्या (‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या) पाठ्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ६८ शब्दांमध्ये मांडण्यात आला होता. त्यात वाढ करून तो आता २ सहस्र २०० ते २ सहस्र ५०० शब्दांमध्ये मांडण्यात आला आहे. इयत्ता ८ वीच्या पुस्तकामध्ये ‘राईज ऑफ मराठा’ (मराठ्यांचा उदय) या धड्याच्या २२ पानांमध्ये छत्रपतींचा इतिहास मुलांसमोर मांडला आहे. ‘आपण एवढ्यावर न थांबता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वीपर्यंतच्या प्रत्येक पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

१. ‘सी.बी.एस्.ई.’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याविषयीचा प्रश्न अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत ‘अर्धा तास चर्चे’च्या वेळी मांडला.

२. राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यशासनाकडून अनेक योजना राबवण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी ‘आदर्श राज्यव्यवस्था’ निर्माण केली त्यानुसार पंतप्रधान मोदी देशाचा कारभार पहाण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज अस्सल चरित्र साधन समिती’ अजूनही गठीत (स्थापन) करण्यात आली नाही. शासकीय मुद्रणालयात छत्रपतींविषयी खंड निर्माण झालेले नाहीत. धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर अवमानकारक चित्रफिती, नाटके, कथा, लेखन हे मोठ्या प्रमाणात ‘यू ट्यूब’वर आहे, ते सरकारने काढून टाकावे.’

४. राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य जयंत आसगावकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण पाठ्यपुस्तकांमध्ये केले जाते. ते पुन्हा दुरुस्त केले जाते; परंतु ज्याने हे विकृत किंवा चुकीचे लेखन केले, त्याच्यावर सरकार कारवाई करणार का ?’’

५. शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य जगन्नाथ अभ्यंकर म्हणाले, ‘‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या निकषांनुसार अभ्यासक्रमात राष्ट्रीय इतिहास ७० टक्के आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रम ३० टक्के असला पाहिजे; परंतु महाराष्ट्रातील ३० टक्के इतिहास घेतला पाहिजे.’’