Shankhnad Mahotsav Delhi : भारतीय संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्थापक, प्राच्यम

देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने वाराणसी येथे पत्रकार परिषद !

डावीकडून संजय सिंह, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, प्रवीण चतुर्वेदी आणि अजित सिंह बग्गा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ओटीटी प्लॅटफॉर्म (ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका प्रसारित करण्याचे माध्यम), सामाजिक प्रसारमाध्यमे, ख्रिस्ती मिशनरींच्या हिंदुविरोधी कारवाया आणि वैचारिक अतिक्रमण यांमुळे हिंदु धर्मावर सांस्कृतिक संकटे वाढत आहेत. केवळ कायदे किंवा घोषणा यांद्वारे त्यांचा प्रतिकार शक्य नाही. भारतीय संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी आध्यात्मिक शक्ती आणि नैतिक मूल्ये यांची आवश्यकता आहे. त्यासाठीच सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी या महोत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन ‘प्राच्यम्’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चे संस्थापक श्री. प्रवीण चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत केले. देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने ५ डिसेंबर या दिवशी पराडकर स्मृती भवन येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव स्वागत समितीचे सदस्य सद्गुरु नीलेश सिंगबाळ, वाराणसी व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा आणि सनातन संस्थेचे श्री. संजय सिंह उपस्थित होते.

श्री. प्रवीण चतुर्वेदी पुढे म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्राचे तत्त्वज्ञान व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांमध्ये मूल्यांची पुनर्निर्मिती करेल. या महोत्सवात सनातन संस्कृतीवर संवाद, सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन, राष्ट्रीय सुरक्षा, आतंकवाद-नक्षलवाद यांची पार्श्वभूमी, संरक्षण नीती आणि राष्ट्रीयत्व दृढ करण्यासाठी उपाय  यांसारख्या विषयांवर विविध क्षेत्रांतील तज्ञ मार्गदर्शन करतील. ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयावरही या महोत्सवात विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.’’ ‘देहलीतील महोत्सव राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक ठरेल’, असे संजय सिंह यांनी सांगितले.

सनातन राष्ट्र स्थापनेचा संदेश देशभरात पोचवण्यासाठीच महोत्सव ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ

देशात पुन्हा सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचा जागर व्हावा, यासाठी भारत  विश्वकल्याणकारी ‘सनातन राष्ट्र’ म्हणून उदयास येणे अत्यावश्यक आहे. हा संदेश देशभरात पोचवण्यासाठी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ आणि सनातन संस्था यांद्वारे भव्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात उत्तरप्रदेशातून विविध संघटनांचे २७० हून अधिक सनातन राष्ट्र समर्थक उपस्थित रहातील’, अशी माहिती वाराणसी व्यापार मंडळाचे अजित सिंह बग्गा यांनी दिली.