Keshav Prasad Maurya : बाबरीची एकही वीट रचू देणार नाही !

उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची चेतावणी

वर्तुळात केशव प्रसाद मौर्य

लक्ष्मणपुरी – तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा राष्ट्रीय जनता दल हे सर्वच भगवान श्रीराम आणि हिंदु समाज यांच्या विरोधात उभे रहाणारे पक्ष आहेत. बाबर परकीय आक्रमक होता. त्याने श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर पाडून तेथे ढाचा उभारला होता, जो ६ डिसेंबर १९९२ या दिवशी रामभक्तांनी हटवला. आता बाबराच्या नावाची वीटही भारतात रचू दिली जाणार नाही, अशी चेतावणी उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली.

मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे येत्या ६ डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करणार असल्याची घोषणा तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मौर्य यांनी हे वक्तव्य केले.

वर्ष २०२६ मध्ये जनता तृणमूल काँग्रेस सरकार उखडून टाकेल ! – मौर्य

मौर्य पुढे म्हणाले की, असे वाद निर्माण करणारे लोक घुसखोरांचे समर्थक आहेत आणि देशभर चालू असलेल्या कारवाईत एकही घुसखोर भारतात ठेवला जाणार नाही. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. बंगालची जनता वर्ष २०२६ मध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार उखडून टाकेल. जंगलराज संपवून सुशासनाला पाठिंबा देईल. इतर राज्यांप्रमाणे बंगालमध्येही भाजपला संधी मिळेल, असा त्यांचा दावा आहे.

(म्हणे) ‘याला वादाचा विषय का बनवला जात आहे ?’ ! – काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत

सुरेंद्र राजपूत

माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत यांनी म्हटले की, मंदिरांचे भूमीपूजन करता येते. त्यामुळे मशिदींसाठी तसे करण्यात अडचण कशी काय असू शकते ? एखादी व्यक्ती मशीद, मंदिर, गुरुद्वारा किंवा चर्च उभारत असेल, तर त्यात वाद निर्माण होण्याचे कारणच नाही. याला वादाचा विषय का बनवला जात आहे ? प्रत्येक धर्माला स्वतःच्या उपासनेसाठी स्थान उभारण्याचा अधिकार आहे. (विरोध मशिदीला नाही, तर ‘बाबरी’ या नावाला आहे. भारतातील मुसलमानांचा आणि विशेष करून बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा बाबर कोण लागतो ? बाबराने अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद बांधली होती, हा इतिहास ठाऊक असतांना त्याच्या नावाने पुन्हा मशीद का बांधली जात आहे ? हा हिंदूंना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न आहे आणि यालाच विरोध केला जात आहे. असे असतांना काँग्रेस बाबरी आणि त्यांचे वंशज यांना पाठीशी घालून ती देशद्रोही आणि हिंदुद्रोही आहे, हे पुन्हा उघड करत आहे. अशा काँग्रेसला हिंदूंनी लवकरात लवकर राजकीयदृष्ट्या संपवणे आवश्यक ठरले आहे ! – संपादक)

(म्हणे) ‘देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे !’ – काँग्रेसचे नेते उदित राज

उदित राज

काँग्रेसचे आणखी एक नेते उदित राज यांनीही मशिदीची पाठराखण केली. ते म्हणाले की, मंदिरांची पायाभरणी केली जाऊ शकते, तेव्हा मशिदींसाठी पायाभरणी करण्यात काय अडचण आहे ? विनाकारण वाद पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे.

मशिदीला राजकारणाचे रूप देऊ नका !

काँग्रेस उत्तरप्रदेशातील खासदार इम्रान मसूद यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, कोणत्याही बाजूने झालेल्या धार्मिक वक्तव्यांनी केवळ नकारात्मक परिणाम होतात. मशिदीचे कार्य उपासनेसाठी असते, राजकारणासाठी नव्हे. धार्मिक स्थळांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये.

मशीद बांधली, तर श्रीराममंदिर बांधू ! – भाजपचे खासदार ज्योतिर्मय सिंह महतो

ज्योतिर्मय सिंह महतो

भाजपचे खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी तीव्र करत म्हटले की, बाबर आक्रमक होता आणि त्याच्या नावावर काहीही उभारणे योग्य ठरणार नाही. तृणमूल काँग्रेस अशा प्रकारचे पाऊल उचलून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. बाबरी नावाची मशीद कुठेही बांधली गेली, तर त्याला विरोध म्हणून राममंदिर उभारू आणि रामलल्ला परत आणू. तृणमूल काँग्रेस धर्माच्या नावावर राजकारण करत असली, तरी तिने मुसलमानांसाठी काही ठोस कार्य केलेले नाही.

मुसलमानांच्या मतांसाठी अट्टहास ! – भाजपचे खासदार खगेन मुर्मू

खगेन मुर्मू

भाजपचे खासदार खगेन मुर्मू यांनी आरोप केला की, आमदार कबीर हे सर्व करून ममता बॅनर्जी यांचा राजकीय आधार टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने तृणमूल लांगूलचालनाची भूमिका आणखी ठळक करत आहे. तृणमूल मुसलमानाच्या मतांसाठीच हे सर्व करत आहे. मुर्शिदाबादमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ७५ टक्के आहे.


हेही वाचा → Babri Masjid : बंगालमधील बेलडांगा येथे ६ डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करणार ! – आमदार हुमायू कबीर, तृणमूल काँग्रेस