Maharashtra Jersey Cow Emblem : कृषी विभागाने बोधचिन्हावरील ‘जर्सी गायी’चे चित्र हटवून आणले ‘भारतीय गायी’चे चित्र !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – दैनिक ‘सनातन प्रभात’ने ८ नोव्हेंबर या दिवशी दिलेल्या वृत्तानंतर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने बोधचिन्हावरील ‘जर्सी’ गायीचे चित्र हटवले असून त्यामध्ये आता भारतीय गायीचे चित्र आणले आहे. ११ नोव्हेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते.

७ नोव्हेंबर या दिवशी कृषी विभागाने शासन निर्णयाद्वारे बोधचिन्ह आणि बोधवाक्य प्रसिद्ध केले होते. यामध्ये बोधचिन्हावर मात्र ‘भारतीय गायी’ऐवजी ‘जर्सी गायी’चे चित्र घेतले होते. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ने ८ नोव्हेंबर या दिवशी हे वृत्त प्रसिद्ध केले. यासह ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ही माहिती वृत्तासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना ‘एक्स’ खात्यावर पाठवली होती. यानंतर कृषी विभागाकडून बोधचिन्हात सुधारणा केली. ११ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण केलेल्या बोधचिन्हात भारतीय देशी गायीचे चित्र घेतले आहे.

जर्सी गाईचे चित्र असलेला आधीचा लोगो

भारतीय गाईचे चित्र असलेला सुधारित लोगो

(चित्रांवर क्लिक करा)

‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे देशी गायीच्या संवर्धनाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्यानेही देशात सर्वप्रथम देशी गायीला ‘राज्यमातेचा दर्जा’ दिला आहे. महाराष्ट्र शासनाने देशी गायींच्या संवर्धनासाठी गोशाळांतील देशी गायींना प्रति गाय ५० रुपये इतके अनुदान घोषित केले आहे. असे असतांना कृषी विभागाच्या बोधचिन्हामध्ये मात्र जर्सी गायीचे चित्र देण्यात आले. कृषी विभागाची ही भूमिका कृषी राज्य आणि केंद्र शासनाच्या धोरणाच्या विसंगत आहे. त्यामुळे कृषी विभागाने बोधचिन्हात सुधारणा करून भारतीय देशी गायीला प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे, असे वृत्त ‘सनातन प्रभात’ने प्रसारित केले होते.

असे आहे कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह आणि बोधवाक्य !

शेतीच्या उत्थनासाठी आणि काळसुसंगत असे स्वत:चे नवीन बोधचिन्ह आणि बोधवाक्य महाराष्ट्र कृषी प्रकाशित केले आहे. ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ हे महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बोधवाक्य आहे. नवीन बोधचिन्हावर हातावर असलेले रोप, ट्रॅक्टर, भारतीय गायीचे चित्र आणि तंत्रज्ञानाचे चिन्ह देण्यात आली आहेत.